कृषी सहायकांचा सल्ला मिळेल का?
By Admin | Updated: June 4, 2014 23:58 IST2014-06-04T23:58:41+5:302014-06-04T23:58:41+5:30
शेतकर्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे.

कृषी सहायकांचा सल्ला मिळेल का?
शेतकरी बांधवांचा सवाल : कर्मचारी असतात बेपत्ता
वर्धा : शेतकर्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासह शासनाच्या योजनांची माहिती शेतकर्यांना मिळावी, शासकीय योजना राबविल्या जाव्यात यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अनेक कृषी सहाय्यक गावात जातच नसल्याने शेतकर्यांना सल्ला मिळत नाही. यामुळे शेतकर्यांची फजिती होत आहे.
कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहायकांकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकर्यांना शेती विषयक सल्ला मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी तसेच शासनाकडून राबविण्यात येणार्या योजना योग्यप्रकारे राबविल्या जात आहेत का, या पाहणीसह इतर उद्देशाने कृषी विभागाकडून कृषी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कृषी सहाय्यकांची नेमणूक कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. कृषी सहायकांनी ठरवून दिलेल्या गावांमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करणे, शासनाच्या योजनांची माहिती देणे असा या मागचा उद्देश असला तरी कृषी सहायक मात्र आठवड्यातून एकदाच ठरवून दिलेल्या गावात जात असल्याचे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
यामुळे शेतकर्यांना वेळेवर सल्ला व मार्गदर्शन मिळत नाही. अनेक कृषी साहाय्यक मुख्यालयी न राहता इतरत्रच राहतात. ते आठवड्यातून एखादेवळी गावात जातात व ठराविक शेतकर्यांच्याच भेटी घेतात. यामुळे इतर शेतकर्यांना मार्गदर्शन हवे असेल तर त्यांना कृषी सहाय्यक शोधावा लागतो.
याकरिता संबंधित प्रशासनाने लक्ष देत त्वरित कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कारण पेरणीचा हंगाम काही दिवसांवर असताना कृषी सहायक बेपता राहतात. यामुळे काय काळजी घ्यावी याची माहिती शेतकरी बांधवांना मिळत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)