बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण होणार?
By Admin | Updated: January 10, 2015 23:01 IST2015-01-10T23:01:06+5:302015-01-10T23:01:06+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव ते आर्वी रस्त्यावर रेल्वेगेट आहे़ रेल्वे गाड्यांच्या सतत रहदारीमुळे हे गेट कित्येक तास बंद असते़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ रेल्वे

बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण होणार?
प्रभाकर शहाकार - पुलगाव
मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव ते आर्वी रस्त्यावर रेल्वेगेट आहे़ रेल्वे गाड्यांच्या सतत रहदारीमुळे हे गेट कित्येक तास बंद असते़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ रेल्वे लाईनमुळे पुलगाव शहरही उत्तर-दक्षिण भागात विभागले गेले आहे़ यामुळे रेल्वे उड्डाण पूल गरजेचा आहे़ चार महिन्यांपूर्वी ४५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले़ निविदा काढल्या; पण कामास सुरूवात झाली नाही़ यामुळे रेल्वे उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण होणार काय, हा प्रश्नच आहे़
अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले़ जागा, मुख्य बाजारपेठ, निधी व अन्य कारणांनी उड्डाण पुलाचा प्रश्न रेंगाळला होता़ यात हैदराबाद-भोपाळ महामार्ग बंद राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सुटावी म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले़ याचे फलित म्हणून रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागला. राज्य शासनाचे ३५ कोटी व केंद्र शासनाचे १० कोटी असे ४५ कोटी रुपये पुलासाठी मंजूर झाले़ पुलाच्या बांधकामास राज्य शासनाने नियोजन प्रकरण क्र. ६७९ नियोजन-३ दि. २७ मे २०१४ अन्वये मान्यता दिली़ जून २०१४ च्या पुरवणी अर्थ संकल्पात हा प्रकल्प नव्याने समाविष्ट करून निधीची तरतूदही करण्यात आली़ रेल्वे मंत्रालयानेही उड्डाण पुलाच्या नकाशाला मान्यता दिली़ पुलाच्या बांधकाम निविदाही काढल्या; पण ठराविक मुदतीत कुठलीही निविदा प्राप्त न झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र बोरकर यांनी दिली.
या उड्डाण पुलाची लांबी ६५६ मीटर तर रूंदी १२ मीटर राहणार आहे. रेल्वेच्या ३ खांबांसह एकूण ३४ खांबांवर बांधण्यात येणारा हा उड्डाण पूल तीन पदरी राहणार आहे. पुलाचा उतार आर्वी नाका व दुसऱ्या बाजूचा उतार मील व बस आगार यांच्या मधील मार्गावर राहणार आहे. आर्वीकडून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्याच्या दृष्टीने दक्षिणेकडील उताराखालून मार्ग राहणार आहे. यानवीन प्रस्तावामुळे स्टेशन चौकातील व्यापारी प्रतिष्ठानेही सुरक्षित राहणार आहेत़ आता या रेल्वे उड्डाण पुलाला प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊन मूर्त रूप कधी प्राप्त होणार, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत़