कुठे गार, कुठे कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:15+5:30

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते.

Where the hail, and the hail | कुठे गार, कुठे कोसळधार

कुठे गार, कुठे कोसळधार

Next
ठळक मुद्देआर्वी, कारंजा तालुक्याला गारपिटीचा तडाखा : संत्रा, केळीच्या बागा उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षीच्या निसर्गकोपातून शेतकरी सावरला नसतानाच नवीन वर्षही शेतकऱ्यांसाठी संकट घेऊनच आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यातच गारपिटीनेही झोडपून काढल्याने आर्वी व कारंजा तालुक्यातील केळी, संत्राच्या बागा उद्धवस्त झाल्या असून कापूस, चना, तूर व गव्हाच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसह पहिला व दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरण चांगलेच गारठले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास आणि रात्रीच्या सुमारासही जिल्ह्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. त्यात आर्वी आणि कारंजा तालुक्यात चांगलीच गारपीट झाल्याने शेतशिवारात पांढरे झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वर्धा, सेलू, हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा या आठही तालुक्यात पावसाचा कमी अधिक जोर कायमच होता. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना उबदार कपड्यांसह पावसापासून बचाव करणारे कपडे एकसाथ घालूनच घराबाहेर पडावे लागले. इतका गारठा वातावरणात तयार झाल्याने याचा परिणाम शेती पीक, पशुपक्षी व नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत आहे.

आर्वी तालुक्यात २० मिनिटे गारांचा मारा
आर्वी : गुरुवारी पहाटे आर्वी तालुक्यामध्ये तब्बल वीस मिनिटे अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, टोणा, दहेगाव, शिरपूर, लाडेगाव, जळगाव, वर्धमनेरी, टाकरखेडा, सावळापूर, मांडला, गुमगाव, पिंपळखुटा, पाचेगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, वाढोणा, वागदा, निंबोली, पिपरी, खुबगांव, शिरपूर, बेलोरा, खडकी, परतोडा, नादंपूर, एकलारा, राजापूर, इठलापूर, खडका, सावलापूर, पाचोड, चिंचोली, हिवरा, हर्राशी, निंबोली व वाठोडा यासह ४० गावातील ३० हेक्टरमधील कापूस, हरभरा, तूर, गहू, हळद व केळी या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात लिंबाच्या आकाराची गार पडल्याने घरावरील टिनांनाही खड्डे पडले आहे तर वादळामुळे काहींचे छतही उडाले आहे. नांदपूर येथील केळी उत्पादक शेतकरी बाळा जगताप यांच्या २४ एकर शेतातील ४० हजार केळीच्या झाडांपैकी २० हजारांपेक्षा झाडे जमिनदोस्त झाल्याने जवळपास २५ लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले.

कारंजात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान
कारंजा (घा.)- तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसांच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराची गार पडल्याने तालुक्यातील संत्रा उत्पादकांला मोठा फटका बसला आहे. यासोबतच कापुसही भिजला असून शेतकऱ्यांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, कन्नमवारग्राम, बांगडापूर, रहाटी, काजळी, सेलगाव (ल), परसोडी, बोंदरठाणा या परिसरात गारपीट झाले. या अवकाळी पावसात जनावरांसाठी शेतात राखून ठेवलेला जनावरांचा चाराही ओला झाला आहे. यावर्षी कापूस उत्पादकांचे हाल झाल्याने संत्रा उत्पादकांनी मेहनत घेऊन बागा फुलविल्या. संत्रा बागा बहरल्या असतानाच गारपीटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. शेतकऱ्यांनी चना व गव्हाला नुकताच ओलीत केले होते आता या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हे दोन्ही पिके जळण्याची भिती निर्माण झाली असून तुरीचे पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Where the hail, and the hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस