पीक विमा योजनेचा लाभ कधी मिळणार?
By Admin | Updated: December 25, 2014 23:37 IST2014-12-25T23:37:04+5:302014-12-25T23:37:04+5:30
सोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे

पीक विमा योजनेचा लाभ कधी मिळणार?
फणिंद्र रघाटाटे - रोहणा
सोयाबीन या पिकाचा पीक विमा हप्ता परिसरातील जवळजवळ सर्वच कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी भरला. कधी नव्हे एवढी नापिकी झाली. आता पीक विमा योजनेचा फायदा आपणास मिळेल असे वाटत असताना योजनेचा लाभ मिळण्याची १५ डिसेंबर ही तारीख उलटून गेली. तेरीही शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात पीक विमा योजनेचा लाभ जमा झालेला नाही. परिणामी, सदर लाभ कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़
खरीप हंगामाच्या वेळी राज्याच्या कृषी विभाग व बँॅकांनी भरपूर प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या पीक विमा योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा योजनेचा सदर पिकांचा हफ्ता बॅँकांनी परस्पर काढून घेतला. तर गैरकर्जदार शेतकऱ्यांना विविध प्रलोभने दाखवित नगदी जमा करण्यास बाध्य केले. खरीपाच्या सुरूवातीला हवामानाचा सूर लक्षात घेता यावर्षी दुष्काळ पडणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत असल्याने जवळजवळ ९० टक्के शेतकऱ्यांनी कोट्यावधी रूपये पीक विम्या हफ्त्याच्या स्वरूपात बॅँकेत जमा केले. त्यामुळे विमा कंपनी मालामाल झाली. आता खरिपाचा हंगाम संपला. पिकांची पैसेवारी अत्यल्प आली. सर्वत्र दुष्काळ पडला. त्यामुळे यंदा नक्कीच पीक विमा योजनेचा लाभ आपल्याला मिळेल अशी आशा समस्त शेतकऱ्यांना होती. पीक विमा योजनेचा लाभ दि. १५ डिसेंबर पर्यंत पात्र शेतकऱ्यांना दिला जावा असा नियम आहे. पण तारीख लोटूनही विमा कंपन्या आणि शासन गप्प आहे.
त्यामुळे याबाबत कोणाला विचारावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कुणालाही विचारण्यापेक्षा शेतकरी आपसातच एकमेकांना पीक विमा योजनेचा लाभ केव्हा मिळणार असा प्रश्न वारंवार विचारताना दिसत आहे.