विहिरींनी तळ गाठला

By Admin | Updated: April 20, 2016 02:18 IST2016-04-20T02:18:12+5:302016-04-20T02:18:12+5:30

शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता ...

The well has reached the bottom | विहिरींनी तळ गाठला

विहिरींनी तळ गाठला

नागरिकांची भटकंती : नळयोजना कुचकामी
समुद्रपूर : शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता मधुकर कामडी यांचा वॉर्ड क्रमांक ८ यासह वॉड क्रमांक १४, वॉर्ड क्रमांक १५ व वॉर्ड क्रमांक ३ या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता फजिती होती आहे. यावर उपाययोजना आखण्याची मागणी आहे.
गावात १९७२ मध्ये तत्कालीन सरपंच स्व. नथ्थूजी काकडे, ग्रामसेवक गजानन कळसकर यांनी गावात नळयोजना अस्तित्त्वात आणली. यावेळी गावाची लोकसंख्या २५०० होती. त्यावेळी ५००० लोकसंख्याचा आराखडा ठेवून ही योजना कार्यान्वित केली होती. आता ४४ वर्षांत समुद्रपूरची लोकसंख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. येथील वॉर्ड क्र. ८, १३, १४, १५ मध्ये योजना पोहोचली नसल्याने नागरिकांनी विहिरी खोदल्या. या विहिरींचा आता वाढत्या तापमानामुळे पाझर कोरडा झाला आहे. असलेले पाणी गाळयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
ले-आऊट मालकानी १० वर्षांपूर्वी ज्या विहिरी निर्माण केल्या होत्या त्याही कोरड्या झाल्या. त्यांची आशा आता शासनाकडे आहे. नगरसेविका कांबळे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीतील सार्वजनिक विहिरीत बारस्कर यांच्या विहिरीतील पाणी नगर पंचायत प्रशासनाने पाईपद्वारे सोडले असल्याने तेथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे. न.पं. प्रशासनाने पुढील १० वर्षांचा आरखडा घेवून किमान २५ हजार लोकसंख्येचा अंदाज घेत पाणी पुरवठा योजना आखण्याची गरज व्यक्त होत आहे.(ताुलका प्रतिनिधी)

पाणी टंचाईकरिता नागरिकही जबाबदार
सार्वजनिक विहिरीवर प्रत्येक घरमालकाने मोटारपंप लावून बेसुमार उपसा केला. यामुळे आज ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील पाणी टंचाईकरिता नागरिकच जबाबदार आहे. त्यांनी कधी पाण्याचे महत्त्व समजूनच घेतले नाही. यामुळे या भागात आता पाणी वाचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The well has reached the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.