पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

By Admin | Updated: June 8, 2014 00:04 IST2014-06-08T00:04:23+5:302014-06-08T00:04:23+5:30

जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन

Weight 16 hours while the mercury is at 47 degrees | पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

महावितरणचा अफलातून कारभार : विभाग म्हणतो, वर्धा जिल्ह्यात भारनियमनच नाही
वर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन केले जात आहे. या भागातील नागरिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.
खरीप हंगाम सुरू झाला आहे. मृग बरसण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. या अनुषंगाने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची शेती आहे. त्यांना शेतात पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे तो ओलित करू शकत नाही. सध्या जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या १४ ते १६ तासांच्या भारनियमनामुळे ओलित कुठून करावे अशी चिंता त्याला आहे. इतक्या तासाच्या भारनियमनामुळे गावकर्‍यांनाही कमालीच्या तापमानाशी झुंज द्यावी लागत आहे. गावांमध्ये बहुतांश घरांचे छप्पर हे टिनाचे आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे टिना आगीसारख्या तापत आहे. यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. घराबाहेर पडले तर थेट तापमान अंगावर घ्यावे लागते. मोठय़ांनाच या तापमानात दिवस काढणे कठीण असताना लहान मुलांचे तर हालच आहे. एकूणच तापमान आणि अशातच होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.
शहरातील नागरिकांना मात्र या भारनियमनाचा फारसा फटका नाही.  शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. या आगीत कोणीही घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारपेठांमध्ये दुकानदारांशिवाय एकही ग्राहक फिरकताना दिसत नाही. एकूण वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिकट परिस्थितीत महावितरण भारनियमन करून या आगीत तेल टाकण्याचे काम करीत आहे.
महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात  ३ हजार मे.वॅ. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला, असेही सांगण्यात आले; मात्र आता ही स्थिती राहिली नाही. या आठवड्यापासून भारनियमन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भारनियमनाच्या शेड्युलमध्ये ‘डी’ सेक्शनमध्ये मोडत असलेल्या फीडर परिसरात भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागातील दोन, आर्वी आणि वर्धा उपविभागातील प्रत्येकी एक फीडर डी मध्ये येत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना १४ ते १६ तास भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती केवळ वर्धेची नसून ती राज्याची असल्याचेही कार्यकारी अभियंता आर. आर. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: Weight 16 hours while the mercury is at 47 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.