कोरोनामुळे गुरांसह आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:27+5:30
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम समुद्रपूर येथील सर्वांत मोठा गुरांचा बाजार व आठवडी बाजारावर झाला आहे.

कोरोनामुळे गुरांसह आठवडी बाजार बंद
सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम समुद्रपूर येथील सर्वांत मोठा गुरांचा बाजार व आठवडी बाजारावर झाला आहे. या बाजाराची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोंद आहे. तसेच तालुक्यातील कोरा, नंदोरी, गिरड, मांडगाव, जाम या बाजारावरही कोरोनाचा परिणाम झाला आहे.
समुद्रपूर गुरांच्या बाजारात जिल्ह्यातील नव्हे इतर जिल्ह्यातील गुरांचे व्यापारी गाई, म्हैशी, बैलजोडी खरेदी करण्याकरिता या बाजारात मोठ्या संख्येने येतात. एका बैलजोडीची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. मात्र, राज्यासह देशावर कोरोनाचे सावट असल्याने खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे.
परिणामी, येथील व्यवहार अडचणीत आले आहेत. तसेच येथील आठवडी बाजारात धान्य आणि मिरची बाजार याचाही समावेश आहे. तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थांची ये-जा थांबल्याने व्यवहार ठप्प आहेत. एकंदरीत एक ते दीड कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने आर्थिक मंदी येण्याची शक्यता शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली आहे.
समुद्रपूर येथे गुरांचा बाजार रविवारी बंद ठेवल्याने गाई, म्हैशी, बैलजोडी, गुरे यांची विक्री व खरेदी न झाल्याने किमान दीड कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.
- शंकर धोटे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर.