‘जलयुक्त’ ठरले जिल्ह्यासाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:16 IST2019-07-28T22:16:29+5:302019-07-28T22:16:50+5:30
माथा ते पायथा असे नियोजन करून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनाचे काम जिल्ह्यात करण्यात आले आहे. कारंजा तालुका हा वर्धा जिल्ह्याचा माथा असून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळेच यंदा हिवाळ्याच्या सुरूवातीला जलसंकटाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या नाही.

‘जलयुक्त’ ठरले जिल्ह्यासाठी उपयुक्त
महेश सायखेडे। लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माथा ते पायथा असे नियोजन करून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनाचे काम जिल्ह्यात करण्यात आले आहे. कारंजा तालुका हा वर्धा जिल्ह्याचा माथा असून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळेच यंदा हिवाळ्याच्या सुरूवातीला जलसंकटाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या नाही. असे असले तरी काही कामे पाहिजे त्या पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारीही कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
चामला येथील बंधारा फुटला
तालुका कृषी अधिकारी कार्यालय आष्टी अंतर्गत मौजा चामला येथे जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ मध्ये बंधारा बांधण्यात आला. यामध्ये सिमेंट कॉक्रीट ऐवजी फाडीचे दगड टाकल्याने या बंधाऱ्याची अल्पावधीतच दैनावस्था झाली. शिवाय सध्या तो ठिकठिकाणी फुटला आहे. त्यामुळे तो बंधारा सध्या नागरिकांच्या अडचणीत भर टाकणारा ठरत आहे. या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले नसल्याचे सांगण्यात येते.