नळ योजनेच्या टाकीतून पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: February 26, 2016 02:33 IST2016-02-26T02:33:25+5:302016-02-26T02:33:25+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो.

नळ योजनेच्या टाकीतून पाण्याचा अपव्यय
जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : हजारो लिटर पाण्याच्या अपव्ययामुळे गावावर पाणी टंचाईचे सावट
वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जाणवत असलेली पाणी टंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार होतो. या आराखड्यानुसार निधी खर्च होतो. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावात पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसते. यामुळे पाणी टंचाई निवारण्याच्या शासनाच्या प्रयत्नांवरच पाणी फेरल्या जात आहे. असाच प्रकार वायगाव (निपाणी) येथे उघड झाला आहे.
वायगाव येथे जीवन प्राधिकरणाची नळ योजना आहे. या नळांना पाणी पुरविण्याकरिता गावात असलेल्या टाकीतून केवळ कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसात पाण्याचा असा अपव्यय होत राहिल्यास गावकऱ्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकरता येत नाही.
कधी ग्रामपंचायतीकडे असलेली येथील नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या योजनेमार्फत यशवंत विद्यालयाच्या परिसरात पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली. ही टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर यातील पाणी यशवंत विद्यालयातील विहिरीत पाईपाने जाते. ही विहीर पाण्याने भरल्यानंतरही पाण्याचा पुरवठा बंद केल्या जात नाही. यामुळे विहिरीतील पाणी रस्त्याने वाहते. याला केवळ येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आळशीपणा कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब एका दिवसाची नसून आता नित्याचीच झाली आहे. गावातील नळांना दोन दिवसाआड पाणी येते. वायगाव (नि.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने पिपरी (मेघे) येथून पाईप लाईन टाकली आहे. प्रत्येकाच्या नळाला या विभागामार्फत मिटर दिले आहे. यामुळे नळाच्या पाणी वापरामुळे येणारे देयकासह दुर्लक्षितपणामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे देयकही ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याची ओरड होत आहे. येत्या दिवसात पाणी टंचाईची झळ पोहोचू नये म्हणून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)