पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवा
By Admin | Updated: March 21, 2015 02:09 IST2015-03-21T02:09:02+5:302015-03-21T02:09:02+5:30
स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना ...

पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे सोपवा
वर्धा : स्थानिक नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अत्यंत कमकुवत आहे़ शिवाय नगर परिषदेला तोट्यात आणणारा व शहरातील नागरिकांना मनस्ताप देणारा ठरत आहे़ यामुळे सदर पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरण विभागाला हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ याबाबत जिल्हाधिकारी, खासदार आणि नगर परिषदेलाही निवेदन सादर करण्यात आले़
येळाकेळी, पवनार व हनुमान टेकडी या तीनही ठिकाणावरून वर्धा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो़ त्याचे महिन्याचे बिल १६ लाख रुपये वर्धा नगर परिषदेला भरावे लागत आहे़ बरेचदा येणारे प्रचंड बिल भरण्याकरिता नगर परिषद सक्षम नसते. यामुळे पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला जातो व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो़ नगर पालिकेत पाणी पुरवठा विभागात तांत्रिक कर्मचारी नाहीत़ १९६९ पासून पवनारच्या पंपिंग मशीन झीजल्या आहेत़ दररोज १८ तासांचे काम असते, एका वेळी दोन मशीनचे काम असते तसेच केबल वायरिंग वडली आहे़ पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीन टाकले जाते़ ते संपले तर ब्लिचींग वा तुरटी टाकली जाते़ येळाकेळी येथे १८ एमएलडी असून एक्सप्रेस फिल्टर नाही. मेकॅनिकल इंजिनिअर नाही़ शिप्ट इंजिनिअर नाही़ वाटर सप्लायमध्ये कुली नाही. प्लंबर नाही, वॉलमॅन कमी आहेत.
नगर परिषदेमध्ये १९९७ ते २०१५ पर्यंतच्या आस्थापना विभागाकडे चौकशी केल्यास कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो़ नागरिकांना पाणी पुरवठा नगर परिषदेमार्फत एक दिवस आड होतो; पण पाण्याचे बिल पूर्ण एक वर्षाचे आकारले जाते़ पूर्वी पाणी बील ९०० रुपये होते ते आज १५०० रुपये झाले आहे़ पाईपलाईन फार जुन्या असून नालीमध्ये आहे़ सदर पाईप सडले असून अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होतो़
यामुळे पालिकेकडून पाणी पुरवठा योजना काढून जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करावी आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत खा़ रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)