नगर पंचायतकडून १६० दिवसच पाणी पुरवठा
By Admin | Updated: November 16, 2016 00:47 IST2016-11-16T00:47:40+5:302016-11-16T00:47:40+5:30
स्थानिक नगर पंचायतीच्या नळ योजनेंतर्गत भर पावसाळ्यात नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो.

नगर पंचायतकडून १६० दिवसच पाणी पुरवठा
योजना कुचकामी : नागरिकांनी रोखला कर
समुद्रपूर : स्थानिक नगर पंचायतीच्या नळ योजनेंतर्गत भर पावसाळ्यात नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. याबाबत नागरिकांनी दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. अनेक नागरिकांनी यासाठी नगर पंचायतचा कर रोखून धरला आहे. नागरिकांच्या या भूमिकेमुळे नगर पंचायत प्रशासनाची गोची झाली आहे.
नगर पंचायतीद्वारे नागरिकांना १६० दिवसच पाणी पुरवठा केला जातो. कर मात्र संपूर्ण वर्षभराचा आकारला जातो. या प्रकारामुळे नागरिक पाणी पट्टी भरण्यास तयार नाहीत. न.प. मुख्याधिकारी मालगावे यांनी ‘व्हॉट्स अॅप’वर टॅक्स थकित असलेल्या नागरिकांची यादी प्रसिद्ध केली. यासाठी एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप तयार करून कर भरण्याबाबत जाणीव करून देण्यात आली. जप्तीची नामुष्की व बदनामी टाळावी, हा त्या मागचा हेतू आहे. या ‘व्हॉट्स अॅप’च्या यादीमध्ये गावातील सात पत्रकार आणि माजी सरपंच यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अनेक नागरिकांनी नगर पंचायतीने मुलभूत सुविधा पुरवाव्या आणि त्यानंतरच कर वसुलीची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यावर नगर पंचायत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)