आजगावच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By Admin | Updated: May 25, 2014 23:49 IST2014-05-25T23:49:18+5:302014-05-25T23:49:18+5:30

स्थानिक ग्रा.पं. अंतर्गत येणार्‍या आजगाव नवीन आणि जुने या दोन्ही गावांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठय़ाच्या विहिरीत पाणी नसल्याने महिलांना हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.

Wandering water for civilians | आजगावच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

आजगावच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

वायगाव (नि.) : स्थानिक ग्रा.पं. अंतर्गत येणार्‍या आजगाव नवीन आणि जुने या दोन्ही गावांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठय़ाच्या विहिरीत पाणी नसल्याने महिलांना हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाय शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. संबंधित विभागासह ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे.

आजगाव नवीन व जुने ही दोन्ही गावे येथून तीन किमी अंतरावर असून वायगाव (नि.) ग्रा.पं. अंतर्गत वार्ड क्रं. ३ मध्ये येतात. या दोन्ही गावांत ग्रा.पं. ची स्वतंत्र नळ योजना देण्यात आली आहे. नवीन आजगाव येथे नळ योजनेची विहीर आहे. पूर्वी याच विहिरीवरून पाणी पुरवठा होत होता. दोन वर्षांपूर्वी जुन्या आजगावला भारत निर्माण योजनेंतर्गत १२ लाखांची पाण्याची टाकी व पाईपलाईन देण्यात आली; पण पाणी पुरवठा एकाच विहिरीवरून करण्यात येत होता. स्वतंत्र योजनेसाठी दुसरी विहीर देण्यात आली नाही. आजगाव नवीन येथील पाणी पुरवठय़ाच्या विहिरीला विशेष पाणी राहत नसल्याने पुरवठा व्यवस्थित होत नाही. या विहिरीच्या खोलीकरणाचे आश्‍वासन देण्यात आले होते; पण अद्याप मुहूर्त गवसला नाही. यामुळे दोन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

काही महिला हातपंपाचा आधार घेत आहेत; पण त्या हातपंपालाही पाणी नाही. दिवसा पाणी मिळत नसल्याने महिला रात्री हातपंपावर पाण्यासाठी जातात. आजगाव जुने येथील नागरिक मधुकर निखाडे यांच्या घरातील विहिरीचे पाणी आणतात. काही ग्रामस्थ बैलबंडीने शेतातून पाणी आणतात. याबाबत वारंवार ग्रा.पं. प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रार करण्यात आली; पण याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचेच दिसते. दोन्ही गावांमिळून ६00 च्या आसपास लोकसंख्या आहे. या गावातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने असंतोष पसरला आहे. नव्याने स्थापन ग्रा.पं. प्रशासनाने तरी आजगाव येथील पाणी टंचाई लक्षात घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Wandering water for civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.