शेतकऱ्याला नुकसान भरपाईची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 19, 2015 01:28 IST2015-02-19T01:28:53+5:302015-02-19T01:28:53+5:30
वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला...

शेतकऱ्याला नुकसान भरपाईची प्रतीक्षा
कारंजा (घा.) : वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला तरीही विद्युत वितरण कंपनीकडून पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
शेतकऱ्याने याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. यानंतर नुकसान भरपाईचा दावा विद्युत वितरण कंपनी कारंजा येथे सादर केला. मात्र शेतकऱ्याच्या मदतीकरिता कार्यालयात मारलेल्या हेलपाटा व्यर्थ ठरत आहे. शेतकऱ्याला न्यायाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यातील बिहाडी शिवारात दि. १२ सप्टेंबर २०१२ ला सदर घटना घडली. अशोक वामन पाटील हे नुकसानधारक शेतकरी आहे. शेतधुऱ्यावर बकऱ्या चरत असताना वादळामुळे ३ फेज ४ वायर लघुदाब वाहिनीचा आर फेज व न्युट्रल कंडक्टर तुटला. हा वायर झुडुपावर पडला. पुरेसे भूसंपर्क न मिळाल्यामुळे वायर विद्युत भारीतच राहीला. या वायरचा स्पर्श झाल्यामुळे दोन बकऱ्या व एक बोकड असे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी भा.वि.नि. अंतर्गत नोंद करण्यात आली. या अपघातात भारतीय वीज अधिनियम २००३ च्या कलमाचे उल्लघंन झाले असून अपघातासाठी विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल विद्युत निरीक्षक यांनी तयार केला. अहवालात हा मुद्दा स्पष्ट नमूद केला असताना नुकसान भरपाई नाकारण्यात येत आहे.
याशिवाय सरकारी पशुवैद्यकीय रूग्णालयाचा पोस्टमार्टम अहवाल मृत्यू दाव्यासोबत जोडलेला असून, बकऱ्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत पावल्याचा उल्लेख केला आहे. शेतकरी पाटील यांनी सर्व कागदपत्रासह वेळोवेळी मृत्य नुकसानीचा दावा सादर केला आहे. मात्र मदत मिळाली नाही.
विद्युत अभियंताने या प्रकरणाबाबत बेपरवाही दाखविली. घटनेनंतर तातडीने पोलीस पंचनामा केला नाही. शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याचा दावा केला असता भरपाई नाकारली जात आहे. याप्रकरणात चोर सोडून संन्याशाचा बळी असाच हा प्रकार दिसत आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या इशारा शेतकऱ्याने दिला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले असून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. कार्यवाहीकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)