मजुरीचे दर कडाडल्याने बळीराजा झाला हवालदिल
By Admin | Updated: July 31, 2016 00:43 IST2016-07-31T00:43:35+5:302016-07-31T00:43:35+5:30
पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे.

मजुरीचे दर कडाडल्याने बळीराजा झाला हवालदिल
आर्थिक भुर्दंड : पावसाआधी शेतातील तण काढणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची लगबग
वर्धा : पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे. पिकांमध्ये वाढलेले तण शेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
मृग नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सामोरे जावे लागले. बसलेला पहिला आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ती पेरणी साधली. पीक उगवले व मशागतीस प्रारंभ झाला. याच दरम्यान सलग आठवडाभर पावसाने हजेरी ठेवली. हा पाऊस पिकांसह वाढलेल्या तणालाही पोषकच ठरला. पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली व पाऊस थांबण्याची प्रतीक्षा सुरू झाली.
,मध्यंतरी पावसाने केवळ दोन दिवस विश्रांती घेतली. त्या काळात काही शेतकऱ्यांना डवरणाची कामे करता आली. तर इतरांना शेतातील पाणी बाहेर काढता आले. ज्यांना काहीच शक्य झाले नाही. त्यांच्या शेतातील पीक परिस्थिती विदारक आहे. रोज येणाऱ्या पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण केला आहे. त्याचा परिणाम पिकांवर होऊन सोयाबीनसह कपाशीचे पीक पिवळे पडले आहे.
पावसाने थोडी उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी आता निंदनाच्या कामाला प्रारंभ केला आहे. पण १०० ते १२० रुपये असलेला महिला मजुराचा रोज आता १५० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही मजुरांना शेतापर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांचे भाडेही शेतकऱ्यांनाच द्यावे लागत आहे. मजूर पैशाकरिता थांबत नाही. फवारणीसाठी असलेल्या मजुरांचे दरही वाढले आहे. उघाड असेपर्यंत निंदण वा डवरण आणि खते देण्याचे कआम आटोपणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मजुरीचे दर कडाडूनही शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसत अआंतरमशागतीची कामे आटिपावी लागत आहे.
जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे व अतिप्रमाणात वाढलेल्या रानवनस्पतीमुळे निंदनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच वेळीअवेळी पावसाला सुरुवात झाल्यास कामात व्यत्यय येतो व नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.(तालुका प्रतिनिधी)
आंतर मशागतीसाठी मजुरांची चणचण
आर्वी- पावसाने उघाड दिल्यामुळे आर्वी परिसरात निंदण, डवरणी, फवारणी यासह पिकांना खत देण्याच्या कामांना वेग आला आहे; परंतु शेतातील कामे करण्यासाठी मजुरवर्गच मिळेनासा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे अधिक पैसे देवून मजुरांकडून कामे करून घ्यावी लागत आहे.
दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप थांबली आहे. या काळात होईल तेवढी आंतरमशागत करणे गरजेचे आहे. शेतातील तण पुर्णपणे नाहिसे करणेही आवश्यक झाले आहे. लगेच पाऊस आल्यास पुन्हा तण वाढयाला सुरुवात होणार आहे. यामुळे तण काढून टाकणे आवश्यक आहे. सोबतच रोगांचा प्रादुर्भाव होवू नये याची आताच खबरदारी घेत फवारणी करणेही गरजेचे झाले आहे. पण यासर्व कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे.(शहर प्रतिनिधी)