कृषी केंद्रात नियमाचे उल्लंघन
By Admin | Updated: July 27, 2014 23:53 IST2014-07-27T23:53:13+5:302014-07-27T23:53:13+5:30
कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित

कृषी केंद्रात नियमाचे उल्लंघन
अधिकाऱ्यांचे अभय : साठा, किंमत, तारखेचा फलक बंधनकारक
अनिल रिठे - तळेगाव(श्या.प.)
कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे़ या नियमांना मात्र सर्रास तिलांजली देऊन बहुतांश केंद्रामध्ये अवाजवी किंमतीत वाण विकले जात आहेत. याकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
दुकानात विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे दुकानदारांना बंधनकारक आहे़ या परवान्यामध्ये विक्रीस्थळ व गोदामाचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे़ परवाना नमूद असलेल्या विक्रीस्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणांवरून बियाण्याची विक्री करणे तसेच नमूद गोदामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी साठवणूक करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदीचा भंग आहे़ विक्री केंद्रातून विक्री केला जाणाऱ्या बियाण्यांचा पिकनिहाय व वाणनिहाय तपशील, उत्पादकांचे नाव, उत्पादकाला कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची तारीख इत्यादी तपशील विक्रेत्यांने सही शिक्यानिशी कृषी विभागाला सादर करणे बंधनकारक आहे़ ज्या उत्पादकांचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे़ त्यांना कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी दिलेली परवान्याची प्रत, प्रमाणित बियाण्यांसाठी लॉटनिहाय मुक्तता अहवाल तसेच उत्पादन कंपनीच्या पैदासकाराने स्वाक्षरी केलेल्या वाणांचे ओळखता येणारे गुणधर्म ही कागदपत्रे विक्री केंद्रावर उपलब्ध ठेवणे ही परवानाधारकाची जबाबदारी आहे़
सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेतीमधील दैनंदिन समस्या या परवानाधारकांना सांगून त्यावर उपाययोजना करण्यासाठी रसायनाची व उत्पादनाची मागणी करतात़ याविषयी ज्याची माहिती नाही अशा रसायनांच्या शिफारशी शेतकऱ्यांना करू नये याविषयीच्या कृषी विभागाच्या स्पष्ट सूचना आहेत़ मागणी केलेल्या उत्पादनासोबत अन्य उत्पादने घेण्याबाबतचा आग्रह विक्रेत्यांनी करू नये़ अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही कृषी विभाग डोळेझाक करीत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ याकडे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे़