दुष्काळाच्या छायेत बळीराजाचा बळी
By Admin | Updated: December 22, 2014 22:51 IST2014-12-22T22:51:36+5:302014-12-22T22:51:36+5:30
कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी

दुष्काळाच्या छायेत बळीराजाचा बळी
वर्धा : कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी राहतील अशी आस धरणाऱ्या बळीराजाच्या वाट्याला निराशाच आली. या साऱ्या दु:खाच्या छायेत जीवन जगतानाच बळीराजाचा बळी जात आहे. या बळीराजाच्या उपकाराचे पांग फेडण्याकरिता कधी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते; मात्र आजच्या परिस्थितीत बळीराजाच ‘दीन’ झाल्याने या दिनाकडे त्याने पाठ असल्याचे वास्तव आहे.
कृषी प्रधान देशाचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या बळीराजाचा दिवस म्हणून २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदा मात्र या दिनाला जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाची झालर राहणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत जगत आहे. या परिस्थितीत कुठला शेतकरी दिन आणि कुठला उत्सव असे चित्र ग्रामीण भागात आहे.
राज्यात नवे सरकार आले. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीखर्चावर ५० टक्के नफा धरत हमीभाव देण्यात येईल असे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यांची सत्ता आली असली तरी यानुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची होणारी थट्टा इथेच थांबली नाही, तर त्याच्या उत्पन्नाला व्यापाऱ्यांकडूनच नव्हे, तर बाजारात शासनाचे हस्तक म्हणून ओळख असलेल्या काही एजन्सीकडूनही किमान दरापेक्षा कमी दर दिला. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत त्याला त्याच्याकरिता असलेल्या शेतकरी दिनाची आठवण राहिल अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे.(प्रतिनिधी)