खड्डे बुजविण्याकरिता वर्धेकरांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:14+5:30
शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी खोदकाम केले असून ते बुजविण्याकरिता कंत्राटदाराची डोळेझाक होत आहे. पालिकाही यासंदर्भात बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन व मोर्चा काढण्यापेक्षा वर्धेकरांनी शहरात फलक लावून गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.
शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेेंतर्गत भूमिगत पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. प्रारंभी पाणी पुरवठा योजनेकरिता शहरातील रस्त्याच्या बाजुने तर कुठे मधात खोदकाम करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करुन लावलेले पेव्हींग ब्लॉक निरुपयोगी ठरले. त्यानंतर मलनिस्सारण योजनेकरिता सहा महिन्यांपूर्वी बांधलेले सिमेंटचे रस्ते मधातून खोदण्यात आले. हे खोदकाम वर्धेकरांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.
यात चिमुकल्याचा नाहक बळी गेला असून अनेकांना अपघातही सहन करावे लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील काही भागातील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. शास्त्री चौक ते बजाज चौकपर्यंतच्या रस्त्याची अवस्था फार वाईट असून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या मार्गावर रेल्वेस्थानक असून महामंडळाचे आगार, सिंदी(मेघे), उमरी (मेघे), रसुलाबाद, नागठाणा, वायफड व शांतीनगर परिसरात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता अद्याप पुढाकार घेतला नाही. त्यामुळे समस्याग्रस्त करदात्यांनी या मार्गावर ‘वर्धा नगर परिषद, कृपा करून हे खड्डे आणि रस्ता दुरूस्त करावा, ही नम्र विनंती. आपला एक प्रामाणिक करदाता वर्धेकर.’ अशा आशयाचे फलक लावून पालिकेचे लक्ष वेधले आहे. आता ही गांधीगिरी नगरपालिका प्रशासनासह तेथील लोकप्रतिनिधींना कितपत पचणी पडते, याकडे वर्धा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.