वर्धेकर सैराट; पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:46+5:30
प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात बाळगत औषध घ्यायला जायचे आहे, तर कुणी भाजी, फळ खरेदीसाठी जायचे आहे, अशी बनावट कारणे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

वर्धेकर सैराट; पोलिसांचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विनाकारण शहरातील विविध रस्त्यांवर फेरफटका मारणाऱ्यांना पोलीस विभागाने सोमवारी फटका दिला. ८५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोनान कहर केला आहे. विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोनाने विदर्भातील काही जिल्हेही कवेत घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, कोरानाचे थैमान लक्षात घेता लॉकडाऊनला ३० एप्रिल आणि नंतर ३ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला मुभा देण्यात आली असून त्यालाही सकाळी ७ ते दुपारी १ वाजतापर्यंतची मर्यादा आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात बाळगत औषध घ्यायला जायचे आहे, तर कुणी भाजी, फळ खरेदीसाठी जायचे आहे, अशी बनावट कारणे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसले. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वर्दळ होती. बाजारपेठही गर्दीने फुललेली दिसली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या अनुषंगाने पोलीस विभागाने अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, शहर ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वात शहरातील वर्दळीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक सील करून ८५ दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करीत ५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. अनेक जण जुमानत नसल्याने पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला. कारवाईत दिलीप आंबटकर, अमर लाखे, अमरदीप पाटील आदींचा सहभाग होता.
वर्धेकर अद्याप गंभीर नाहीच!
कोरोनाचा राज्यासह विदर्भातही शिरकाव झाला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून न आल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश आहे. यामुळे नागरिक अद्याप आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असून नेहमीप्रमाणे नागरिकांचे विनाकारण आणि क्षुल्लक बाबींकरिता रपेट मारणे सुरू आहे. त्यामुळे वर्धेकरांनो, गंभीर व्हा, स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, अनावश्यक बाहेर पडणे टाळा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे नागरिकांना करीत होते.
लॉकडाऊनबाबत नागरिकांत संभ्रम
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सकाळी ७ ते दुपारी १ वाजतापर्यंतच मुभा आहे. लॉकडाऊन कायम आहे. मात्र, २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याचा नागरिकांत संभ्रम दिसून आला. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ वाजतानंतरही विविध रस्त्यांवर वर्दळ होती.