वणव्यांच्या नियंत्रणासाठी अत्याधुनिक ब्लोअरचा वापर
By Admin | Updated: May 6, 2016 01:54 IST2016-05-06T01:54:56+5:302016-05-06T01:54:56+5:30
वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीने जाळरेषा निर्माण करण्याऐवजी जाळरेषाची संपूर्ण सफाई करून लागलेली आग तात्काळ आटोक्यात यावी,

वणव्यांच्या नियंत्रणासाठी अत्याधुनिक ब्लोअरचा वापर
वर्धा वनक्षेत्रात ११३ ब्लोअरचे सुरक्षा कचव : साडेतीन हजार किलोमिटर आग नियंत्रण लाईन
वर्धा: वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीने जाळरेषा निर्माण करण्याऐवजी जाळरेषाची संपूर्ण सफाई करून लागलेली आग तात्काळ आटोक्यात यावी, यासाठी अत्याधुनिक अशा ब्लोअरचा वापर वर्धा वनपरिक्षेत्रात सुरू करण्यात झाला आहे. जिल्ह्यातील १८७ बीटामध्ये विभागलेल्या सुमारे ९२ हजार हेक्टर वनक्षेत्रातील अत्यंत मौल्यवान अशा वनसंपदेसोबत वन्यप्राणीचे संरक्षण करण्याचा अभिनव प्रयोग राबविल्यामुळे अद्यापर्यंत तरी मोठी घटना घडली नाही.
उन्हाळ्यात वनक्षेत्रात वाळलेल्या गवत जातीच्या प्रजाती, लहान झाडे व झुडपांना आग लागून मोठ्या प्रमाणात हानी होते. यावर नियंत्रणासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात; परंतु वनव्यात सापडलेले जंगल वाचविणे शक्य होत नाही. यामध्ये लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होते. टिपेश्वर येथील आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. पारंपरिक पद्धतीने वनमजुराच्या हातून फायर लाईन तयार करण्यात येते. एकाच वेळी सर्व जंगलाने पेट घेऊ नये यासाठी कंपार्टमेन्ट तयार करून स्वच्छ केल्यामुळे आग पुढे जात नाही. यासाठी ब्लोअरचा वापर प्रभावी ठरत आहे.
११३ ब्लोअरचे सुरक्षा कवच
वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक अशा ११३ ब्लोअरचा १८७ बीटसाठी वापर करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या धोत्रासह हिंगणी, खरांगणा, कारंजा या क्षेत्रासाठी विशेष नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सरासरी ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये बीट असून प्रत्येक बीटसाठी एका ब्लोअरचा वापर करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.
वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ४३ ब्लोअर तर वन विभागाने २८ लक्ष रुपये निधी दिल्यामुळे ६० ब्लोअर खरेदी करण्यात आले आहेत.
वर्धा वनक्षेत्रात वाघ, बिबट, नीलगाय, रानडुक्कर, हरण, चितळ, सांबर, चिंकारा, मोर आदी वन्य प्राण्यासह मोठ्या प्रमाणात मौल्यवान वनस्पती वृक्षाच्या विविध प्रजाती व जैवविविधता असल्यामुळे वनाचे संरक्षण व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. वन विभागाच्या दिमतीला ११३ ब्लोअर मशीन उपलब्ध झाल्यामुळे जंगलातील वणव्यावर नियंत्रण सुलभ झाले आहे.