अघोषित संचारबंदी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:39+5:30
जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी (शहीद), कारंजा या तालुक्यांमध्ये नागरिकांनी आपल्या घरीच राहून ‘जनता कर्फ्यु’ ला सहकार्य केले. या बंदच्या अनुषंगाने गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन यासह तालुकास्तरावरील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन जनजागृतीही केली होती.

अघोषित संचारबंदी...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यु’ चे आवाहन करण्यात आले होते. जागतिक आपत्तीला रोखण्याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या नागरिकांनी या आवाहनाला साथ देत रविवारी शहरासह ग्रामीण भागातही शतप्रतिशत कडकडीत बंद पाळला.
जिल्ह्यातील वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी (शहीद), कारंजा या तालुक्यांमध्ये नागरिकांनी आपल्या घरीच राहून ‘जनता कर्फ्यु’ ला सहकार्य केले. या बंदच्या अनुषंगाने गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन यासह तालुकास्तरावरील पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन जनजागृतीही केली होती. परिणामी गावकऱ्यांनीही आपल्या शेतातील कामासह इतरही महत्त्वाच्या कामांना एक दिवस थांबा देत हा कर्फ्यु शतप्रतिशत यशस्वी केला. आठही तालुक्यातील प्रतिष्ठाने, कारखाने व इतर सर्व दुकाने सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आली. ऐरवी कामाच्या ओझ्यात वावरताना एकही दिवस विश्रांती न घेणाऱ्यांनाही आजचा दिवस विश्रांती करायला लावण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे गावात जरी शांतता दिसत असली तरीही घराघरामध्ये मात्र अबालवृद्धांच्या गोष्टीगप्पा रंगल्या होत्या.
घरातील सदस्यांनी आजचा पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवून काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर काहींनी बालकांसोबतच विविध खेळही खेळले. त्यामुळे कोरोनाला पळविण्यासाठी आज सर्वांनी जी एकजुट दाखविली ती एकजुट देशासोबतच प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांसाठी महत्त्वाची व विस्मरणीय ठरली आहे. सायंकाळी पाच वाजताचा ठोका पडताच शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही टाळ्या वाजवून सेवा देणाºयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. काहींनी घराच्या गॅलरीत येऊन, काही छतावर चढून तर काहींनी घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या वाजविल्या. सोबतच शंखनाद करुन या आजाराला परतवून लावण्याची परमेश्वराकडे विनंतीही केली.
सेवाग्राम: सेवाग्राम ते हमदापूर या मार्गावरील सर्व गावात जनता कर्फ्युला चांगलाच प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सर्व प्रतिष्ठाने बंद केली. शेतातील कामे ही आज बंद ठेऊ न घरातील मंडळीसोबत सर्वांनी वेळ घालविला. सर्व रस्ते आणि चौक निर्मनुष्य आहे. खेडे गावातील मजुरही आपल्याच घरी असल्याची माहिती तुळजापूर येथील गजानन जिकार, चानकीचे अरविंद पन्नासे व हमदापूर येथील भारत रोकडे व नितेश भोमले यांनी दिली.
चिकणी (जामणी) : चिकणीसह लगतच्या ग्रामीण भागातही जनता कफ्युर्ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वास्तव्यास आहेत. आज सर्व कामे बाजूला सारुन सर्व आपापल्या घरीच थांबले. सकाळी गुरांना चारापाणी करुन घरात गेले. त्यामुळे गावातही शुकशुकाट दिसत होता. हल्ली चणा, गहू पिकांची मळणी जोरात सुरु असून यावर अवकाळीचे सावट कायम आहे. तरीही शेतकºयांनी या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले.
वडनेर : कोरोना हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी शतप्रतिशत सहकार्य केले. व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिक दिवसभर घराबाहेर पडले नाही. गावालगत राष्ट्रीय महामार्ग असताना या मार्गावरीलही वाहतूक थांबली होती. त्यामुळे या परिसरात कधी नव्हे इतकी शांतता पहायला मिळाली. येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी कर्तव्यावर होते.