उंबरकर कुटुंबीयांना आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय
By Admin | Updated: March 2, 2016 02:29 IST2016-03-02T02:29:01+5:302016-03-02T02:29:01+5:30
शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते.

उंबरकर कुटुंबीयांना आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय
तीन शेतकरी थोडक्यात बचावले : १० फूट अंतरावर कोसळली वीज
साहुर : शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते. अशातच एकाएकी जोराच्या कडकडाटासह अवघ्या १० फुटांवर असलेल्या झाडावर वीज कोसळली. यात झाडाचे सात तुकडे झाले; मात्र या नैसर्गिकप्रकोपापासून हे शेतकरी कुटुंब सुखरुप बचावले. यातून आपण बचावलो, यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. हा प्रसंग या कुटुंबासाठी ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय देणारा ठरला.
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी साहुर परीसरात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजांसह मुसळधार पाऊस आला. गावापासून ३०० मिटर अंतरावरील उंबरकर कुटुंबीयाचे शेत आहे. शेतातून निघताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. शेतातील झोपडीपासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झाडावर जोरदार वीज कोसळली. या विजेमुळे सुमारे ४० फूट उंच झाडाचे सात तुकडे झाले. दैव बलबत्तर म्हणून हे तीनही शेतकरी बचावले.
शेतकऱ्यांना वर्षभर निसर्गाला तोंड द्यावे लागते. कधी अति पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ. कधी अत्यल्प उत्पन्न, तर कधी भावात चढउतार. पिकवलेल्या मालाला चांगला भावही मिळत नाही. अवकाळी पावसात वीज कोसळून शेकडोच्या संख्येने शेतकरी मरतात. असाच कडकडाट सोमवारी साहुरवासीयांनी अनुभवला. शेतकरी घराच्या दिशेने निघाले. गावापासून काही अंतरावर नदी पलीकडे उंबरकर कुटुुबीयांचे संयुक्त शेत आहे. एक शेत बोरखेडी मौजामध्ये आहे. प्रशांत उंबरकर, हरिभाऊ नामदेव उंबरकर व कृष्णकुमार नामदेव उंबरकर हे तिनही शेतकरी साहुर मौज्यातील शेतात आले. शेतातील गार्इंना चारा टाकल्यावर पाऊस सुरू झाला. पावसामुळे तिघेही गार्इंच्या गोठ्यात थांबले. मात्र कृष्णकुमार उंबरकर बंडीला टांगलेला सदरा घेण्यासाठी बंडीजवळ गेले. अचानक त्यांच्यापासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झांडावर वीज कोसळली. तिघेही जमिनीवर कोसळले. काय घडले कळेनासे झाले. क्षणात स्वत:ला सावरत एकच आक्रोश सुरू झाला. मात्र तिघांनाही सुखरुप बघताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.(वार्ताहर)
४० फूट झाडाचे सात तुकडे
वीज कोसळली ते बाभळीचे झाड सुमारे ४० फुट उंच होते. ही वीज कोसळताच त्याचे सात तुकडे झाले. हे बघून त्यांना आपण यातून बचावलो, यावर विश्वासच बसत नव्हता. ही आपबिती कथन करतानाही त्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता.