कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

By Admin | Updated: December 21, 2015 02:24 IST2015-12-21T02:24:03+5:302015-12-21T02:24:03+5:30

शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते.

Ultrasonics in Kapadhi in the dryland area | कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी

उत्पादनात घट : शेतकरी चिंतित; एका वेच्यातील कापसावरच मानावे लागले समाधान
विजय माहुरे घोराड
शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. कपाशीची झाडे वाळत असल्याने शेतकऱ्यांकडून उलंगवाडी सुरू झाली आहे.
खरीप हंगामात सोयाबीनची नापिकी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे कापसावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसात प्रारंभी पिकाला समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची वाढ झाली. त्यामुळे चांगले उत्पन्न येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची आशा मावळली. अशात उशिरा का होईना बोर प्रकल्पाचे पाणी वितरकांना सोडण्यात आले. यामुळे सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ओलित केले. यातून तरी उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा होती. दरम्यान, कपाशीवर लाल्याचे सावट दिसू लागल्याने उत्पन्नाची आशा मावळली. एकरी ४ ते ५ क्विंटल कापसावर समाधान मानावे लागले. यामुळे सर्वत्र कपाशीकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा मावळली. यामुुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी करणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कपाशीवर आर्थिक घडी असल्याने कापूस वेचणी होताच ३,८०० ते ४,००० हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागल्याने कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

बाजारात मिळणाऱ्या दराची चिंता
जिल्ह्यातच नव्हे राज्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अशात उत्पन्न कमी होत असतानाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अत्यल्प दर मिळत आहे. या पिकांवरच शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. सध्या कापसाला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चावर आधारित नाही. शिवाय तो स्थिर नाही. यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची ओरड होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यात
गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या वातावरणाचा फटका तुरीला बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळत आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास तुरीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Ultrasonics in Kapadhi in the dryland area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.