परिवहनच्या ‘यशवंती’ला प्रवाशांकडून ‘दे धक्का’
By Admin | Updated: June 20, 2014 00:02 IST2014-06-20T00:02:46+5:302014-06-20T00:02:46+5:30
वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना

परिवहनच्या ‘यशवंती’ला प्रवाशांकडून ‘दे धक्का’
वायगाव(नि.) : वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना सुखमय प्रवासाऐवजी धक्कामय प्रवासाचा अनुभव आला.
वायगाव(नि.)कडे जाणारी बस क्रमांक एमएच०६-५७७५ यात वायगावसह परिसरातील नागरिक प्रवास करीत होते. वायगाव बसस्थानकाजवळ एकाएकी बस बंद पडल्याने सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. वाहक व चालकांनी बस सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न व्यर्थ ठरल्याने प्रवाशांना धक्का देण्याचे सांगण्यात आले. एकीकडे उकाडा आणि त्यात बंद झालेली बस असा दुहेरी त्रास सहन करीत प्रवाशांनी बसला धक्का दिला.
परिवहन महामंडळ एकीकडे प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ करते. मात्र प्रवाशांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना सुखकारक ऐवजी यातनामय प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील प्रवाशांचा नाईलाज असल्याने बसने प्रवास करण्याखेरीज पर्याय नसतो. परिवहन मंडळाकडूनही ग्रामीण भागात नादुरुस्त बसेस दिल्या जातात.
यामुळे बरेचदा ग्रामस्थांना बसखाली उतरून धक्का मारण्याची वेळ येते. परिवहन मंडळातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार रस्त्यात गाड्या बंद पडणे यासारख्या घटना घडतात. याचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो. याची दखल घेणे गरजेचे आहे.(वार्ताहर)