वाहतूक समस्या ठरतेय डोकेदुखी
By Admin | Updated: January 4, 2015 23:18 IST2015-01-04T23:18:38+5:302015-01-04T23:18:38+5:30
हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे.

वाहतूक समस्या ठरतेय डोकेदुखी
वर्धा : हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे. शहरात वाहतुकीचे संचलन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून चालक वाहन पळवितात. शहरातील प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रक पोलीस नियुक्त स्करून बेफाम वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी होत आहे.
शहराची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. हिंगणघाट शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातात. यामुळे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाढते अपघात आणि राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीची समस्या निकाली काढण्यासाठी उड्डाणपुल बांधण्यात आला. यानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीला अपूरे पडत आहेत.
शहरातील मार्गावर धावणारे वाहनांची संख्या वाढली. मात्र रस्त्यांची रूंदी कायमच असल्याने अनेक वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी येथील प्रमुख मार्ग व चौकात वाहतूक पोलीस राहत नसल्याने चालकांना पुढाकार घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी लागते. वर्धा शहराप्रमाणे हिंगणघाट येथे ३० ते ३५ वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे. तसेच पार्किंग झोन तयार केल्यास ही समस्या निकाली निघु शकेल. अतिक्रमण हटविल्यास रस्त्याचे रूंदीकरण करण्यास वाव राहिल. वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याची मागणी आहे. बसस्थानक परिसरात आॅटोसह अन्य खासगी वाहनांच्या रांगा लागत असल्याने वर्दळीकरिता रस्ताच शिल्लक नसतो. कशीबशी वाट काढून चालकांना मार्गक्रमण करावे लागते. समस्येची दखल घेत कार्यवाहीची मागणी नगर विकास सुधार समितीने पोलीस अधीक्षक अनील पारस्कर यांच्याकडे केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)