ऐन हंगामात शेतांवर ‘टॉवर’ची तलवार
By Admin | Updated: June 13, 2014 00:23 IST2014-06-13T00:23:22+5:302014-06-13T00:23:22+5:30
औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य

ऐन हंगामात शेतांवर ‘टॉवर’ची तलवार
वर्धा : औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे; पण यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे़ अल्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाईही दिली जात नाही़ यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे़
वीज वहनाकरिता सध्या सर्वत्र टॉवर उभारणीच्या कामांना वेग आल्याचे दिसते़ औरंगाबाद ते नागपूर या ७६५ केव्ही लाईनचे कामही नागपूरच्या एका कंपनीकडून केले जात आहे़ या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला दिला जात नसल्याचे समोर आले आहे़ याबाबत यापूर्वी शेतकऱ्यांमार्फत महासम्राट बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे पाटील व विदर्भ संपर्क प्रमुख अनिल नागरे यांनी माहिती गोळा केली होती़ यात अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली असल्याचे दिसून आले़ शिवाय शेतात टॉवरचे काम करताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याचे दिसून आले़ जड वाहनांच्या रहदारीमुळे जमिनही खराब होते़ यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे गरजेचे झाले आहे़
टॉवर लाईनच्या या कामाविरूद्ध न्यायालयात दाद मागितली जाणार असून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची बाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, जालना येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधीक्षक या सर्वांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत योग्य व स्पष्ट करार झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे़
संघर्ष व वाद निर्माण होऊ नये म्हणून सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट सूचना द्याव्यात़ यात ज्या शेतकऱ्याच्या शेतात टॉवरचे काम होणार असेल, त्याला टॉवर उभारण्यापूर्वी किती रक्कम देणार, त्या रकमेचा ‘पोस्ट डेटेड’ चेक देण्यात यावा, अशा सूचना देण्याची विनंती महासम्राट बळीराजा संघटनेमार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, उर्जामंत्री व सचिव उर्जा विभाग यांना देण्यात आले आहे़ टॉवरचे काम व होणारे नुकसान याचा अंदाज घेतल्यास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यास १० लाख रुपये मिळायला हवे, अशी मागणी केली आहे़ ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, याची कल्पना सर्व मंत्र्यांना देण्यात आली आहे़ शरद पवार यांनाही कुरीयरमार्फत निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे़ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची बारामती येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून योग्य नुकसान भरपाई देण्यात यासवी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)