शहरातील जनजीवन पूर्व पदाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:02+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित करण्यात आली होती. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. दरम्यान, जिल्ह्यात सुरुवातीला आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) आणि वाशीम येथील २ रुग्णांची नोंद होत हा आकडा २० वर पोहोचला.

शहरातील जनजीवन पूर्व पदाच्या दिशेने
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ ठप्प होती. मध्यंतरी वेळापत्रकानुसार आणि आता सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित करण्यात आली होती. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली.
दरम्यान, जिल्ह्यात सुरुवातीला आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) आणि वाशीम येथील २ रुग्णांची नोंद होत हा आकडा २० वर पोहोचला. या सर्वच रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी होती. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, जिल्ह्यात स्थानिकस्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने जिल्हा प्रशासनाने सलून दुकाने, स्पा, हॉटेल्स वगळता सर्वच व्यवसाय सकाळी ९ ते ५ या वेळात सुरू करण्यास मुभा दिली आहे. मे च्या अखेरच्या आठवड्यात उष्णतेची लाट आल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातच रोहिणीतील पाऊस बरसला. चक्रीवादळाचीही जिल्ह्यावर छाया असल्याने ढगाळ वातावरण आहे.
यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली असून जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत आहे. सकाळपासूनच शहरातील प्रमुख आणि विविध रस्त्यांवर वर्दळ दिसत आहे.
मास्कविनाच मुक्त वावर
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. असे असताना शहरात नागरिकांचा मास्क न वापरताच मुक्त वावर आहे. ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही तीन-तेरा होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनो, धोका अद्याप टळलेला नाही. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, स्वत:सह कुटुंब आणि सर्वांचीच काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.