वाहनधारकांची खड्ड्यांशी झुंज
By Admin | Updated: November 29, 2014 23:26 IST2014-11-29T23:26:29+5:302014-11-29T23:26:29+5:30
येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना

वाहनधारकांची खड्ड्यांशी झुंज
वायगाव(नि.) : येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना उपस्थित होतो. या मार्गाची पूर्णता वाट लागली असून रस्त्यावरील खड्डे प्रवाशाच्या जीवावर उठत आहे. ‘नजर चुकताच खड्डड्यात घुसा आणि अपघात ग्रस्त व्हा’ असाच प्रकार या मार्गावरील खड्ड्यामुळे सध्या सुरू असल्याने वाहनधारकांची सध्या खड्ड्यांशी झुंज सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.
वायगाव(नि.) ते देवळी हे अंतर १२ किलो मीटरचे आहे. याच मार्गाने आजगाव, सिरसगाव हा मार्ग वडद जावे लागते. चंद्रपूर, हिंगणघाट ते पुलगाव, अमरावती जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या संख्येने वाहने धावतात. त्यात खाजगी बस, ट्रक आणि अन्य वाहनांचाही समावेश असतो. हा मार्ग मुख्य मार्ग असल्याने तो सुव्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे.
या मार्गाने प्रवास करताना विदारक अनुभव येतो. वडद ते देवळी दरम्यान तर फुटभर अंतरावर खड्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता आहे हेच कळायला प्रवाशांना मार्ग नसतो. नजर चुकताच वाहन चालकांचा सामना हा खड्ड्यांसोबत होतो. थोडेही लक्ष विचलित होणे वाहन चालकासाठी जीव घणे किंवा दुखापतीस कारणीभूत ठरू शकते. काही भागात तर खड्याची खोली फुटभर असल्याचे दिसून येत आहे. जागोजागी असलेल्या खड्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.
या मार्गाकडे बाधंकाम विभागाचे अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना या मार्गाच्या दुरवस्थेचा अंदाज नसावा असे बोलले जात आहे. या मार्गावर रोज प्रवाशांना खड्ड्यांमुळे मृत्यूलाच आमंत्रण देत प्रवास करावा लागतो. रस्ता दुरुस्तीची मागणी ही वेळोवेळी होते. मात्र त्याकडे बाधंकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वाहन चालकांना वाहणे चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असून काही भागात रस्ता म्हणजे पांदण रस्ता असल्याचा प्रत्यय येतो. या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना अनेकांना मनक्याचे तसेच सांधेदुखीचे आजारही बळावू लागल्याचे सांगितले जाते. या मार्गावर किरकोळ अपघात तर आता नित्याचेच झाले आहे. मात्र मोठा अपघात घडल्यानंतरच बाधंकाम विभागाला जाग येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्धा मार्गे वायगावकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या कंपन्यांमधून अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून दुरुस्तीची मागणी आहे.(वार्ताहर)