नाकर्त्या प्रशासनामुळे शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ
By Admin | Updated: May 14, 2015 02:00 IST2015-05-14T02:00:07+5:302015-05-14T02:00:07+5:30
महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम, नियोजन शून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना बसत आहे़

नाकर्त्या प्रशासनामुळे शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ
तिसरा दिवस : सरपंचही आंदोलनात सहभागी; प्रशासनाची डोळेझाक
आष्टी (श़) : महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम, नियोजन शून्य कारभाराचा फटका सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना बसत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळेच सध्या अंतोरा येथील शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे़ तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच असून अधिकाऱ्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही़ यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़
महाराष्ट्र शासनाने सिंचन विहिरींची सोय शेतकऱ्यांना करून दिली; पण महावितरणचे अभियंते हलगर्जी करीत असल्याने अद्याप काही शेतकऱ्यांना वीज जोडणीच देण्यात आलेली नाही़ परिणामी, उन्हाळी पिके विहिरीत पाणी असताना शेतकऱ्यांच्या हातून गेली. ओलिताची सोय असूनही कित्येक शेतकऱ्यांना पिके नष्ट होत असलेली उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे़ यासह अनेक समस्या अंतोरा सर्कलमध्ये शेतकरी व नागरिकांना भेडसावत आहेत. कनिष्ठ अभियंता वरिष्ठ व पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने सदर शेतकरी व लहानआर्वीचे सरपंच सुनील साबळे यांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला़ महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्धा नदीतील रेतीघाटातून मिळकत असल्याने ते शेतकरी व लाभार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात़ यामुळे संजय निराधार सारख्या योजनांतील तक्रारी वाढल्याचे दिसते़(प्रतिनिधी)
अंतोरा येथील सात तरूण शेतकरी सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत; पण येथील तहसीलदार हिरणवाड यांनी उपोषणकर्त्यांची दखल न घेता अधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागते, ही एक कला आहे, असा कानमंत्र उपोषणकर्त्यांना दिला. शेतकऱ्यांची कामे तातडीने सोडविल्यास अशी वेळ शेतकऱ्यांवर येत नाही व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे सोडून त्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
- राजेश ठाकरे, अंतोरा़