रेल्वेद्वारे जिल्ह्यात हजारो मजूर दाखल

By Admin | Updated: October 3, 2015 01:58 IST2015-10-03T01:58:18+5:302015-10-03T01:58:18+5:30

यंदा आमच्या भागात धानाची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे वर्षभरापुरतेही धान होईल का याची शाश्वती नाही.

Thousands of people enter the district through rail | रेल्वेद्वारे जिल्ह्यात हजारो मजूर दाखल

रेल्वेद्वारे जिल्ह्यात हजारो मजूर दाखल

वर्धा : यंदा आमच्या भागात धानाची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे वर्षभरापुरतेही धान होईल का याची शाश्वती नाही. या काळात वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत सोयाबीन सवंगणीला वेग असतो. त्यामुळे १५ दिवसात बरी कमाई होऊन जाते. त्यातही दरवर्षीपेक्षा जास्त लोक यंदा रोजगारासाठी आले आहेत. कोण किती कमविणार, किती घेऊन जाणार हा प्रश्नच आहे अशी प्रातिनिधीक प्रतिक्रिया सिंदेवाही येथून आलेला किशोर व्यक्त करतो.
आठवडाभरापासून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मजूर रेल्वेने वर्धा जिल्ह्यात लहान मुलांसह दाखल होत आहे. यातील काही सरळ अमरावती, यवतमाळ व नागपूरकडे रवाना होत असल्याचेही दिसते. गलक्याने बसलेले नागरिक, धोपटी बेलने यामुळे वर्धा स्थानकाचा परिसर सध्या भरून गेला आहे. यामुळे अनेक प्रवाश्यांची गैरसोय होत असली तरी आठवडाभर आणखी असेच चित्र राहणार असल्याचे दिसत आहे. दरवर्षी सोयाबीन सवंगणीच्या हंगामात सहा ते सात हजार मजूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होतात. १५ दिवसांसाठी मजूर ५ ते ६ हजार कमवून आपल्या स्वगृही जातात. काही त्यानंतरही आणखी काही दिवस थांबून मिळेल ती कामे करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिकांच्या रोजगारावर तर गदा येतेच पण रोजगारासाठी होत असलेले मानवी स्थलांतर हा मुद्दाही उपस्थित होतो.(शहर प्रतिनिधी)

टोळक्या टोळक्यांनी मजूर जिल्ह्यात दाखल
सहज वर्धा रेल्वेस्थानकावर सध्या नजरा फिरविली असता १० ते १५ बायामाणसाचे एक एक टोळके अशी जवळपास १० ते १५ टोळकी नजरेस पडतात. यातील अनेक जण तिकीट काऊंटर हॉलमध्ये घोळक्याने बसून असल्याने तिकीट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. गत आठवडाभरापासून हाच प्रकार सुरू असल्याने नियमित प्रवासीही संताप व्यक्त करीत असतात.

मालकाची वाट
यातील अनेक मजूर हे दरवर्षी टोळक्याने येत असतात. त्यामुळे अनेकांचा शेतकरी वर्गाशी परिचय असतो. स्थानिक मजुरांच्या मजुरीचे दर वाढल्याने हा प्रकार १० ते १२ वर्षांपासून सुरू झाला आहे. यातही अनेक दलाल सक्रीय असल्याची शक्यता आहे. आल्यानंतर सवंगणीसाठी छोटी मालवाहू वाहने करून गावांमध्ये सादर मजूर दाखल होतात.

१५ दिवसांची कमाई
वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. आॅक्टोबर महिन्याच्या आसपास सोयाबीन सवंगणी केली जाते. या महिन्यात पावसाचा नेम नसतो. त्यामुळे लवकरात लवकर सवंगणी करणे गरजेचे असते. यासाठीच मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. ही गरज ओळखून मजुरांची आवक या काही वर्षात जिल्ह्यात वाढली आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनने दगा दिला. त्यामुळे स्थानिक आणि परजिल्ह्यातील आलेले मजूर असा संघर्ष निर्माण होणार आहे. कोणाला किती काम मिळेल ही चिंता त्यांनाही सतावत आहे.

खाण्यापिण्याचे साहित्यही सोबतच
आलेले मजूर हे १० ते १५ दिवसांसाठी लागणारे सर्वच साहित्य सोबत घेऊन येतात. यामध्ये तांदूळ, दाळ, तेल, तिखट, मिठापासूनचे साहित्य असले. त्यामुळे माणसांपेक्षा याच साहित्याचा स्थानकावर भरणा दिसतो. कुठलाही खर्च न होता मिळेल तेवढा पैसा परत घरी न्यायचा हा एकच उद्देश असल्याचे आलेले मजूर सांगतात.

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील गावे ओस
सध्या दररोज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांतून शेकडो मजूर जिल्ह्यात दाखल होत आहे. आठवडाभरापासून हा प्रकार सुरू आहे. आणखी आठवडाभर हा प्रकार सुरू राहणार आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील गावे ओस पडत असल्याचे सांगण्यात येते. केवळ म्हातारी मंडळी आणि शाळकरी विद्यार्थी गावात आहेत. जवळपास एक महिना ही गावे ओस पडून राहणार आहेत. त्यामुळे म्हातारे व लहान मुलेच गाव सांभाळत असल्याचे सांगितले जाते.

एकरी १५०० च्या आसपास हुंडा
सोयाबीन सवंगणीचा हुंडा एकरी घेतला जातो. यामध्ये १५०० रुपयाच्या आसपास एक री दर आकारला जातो. दहा ते पंधरा जण मिळून हे काम केले जाते. आसपासच्या शेतांमध्ये सवंगणी अटोपतपर्यंत सर कामे चालतात. काही मजूर सवंगणीची कामे आटोपल्यावर गावी परत जातात तर काही कुटुंब आणखी काही दिवस मिळेल ती कामे करून आपली गुजराण करतात. सर्व पैसा आपल्या घरी नेण्याचा पूर्ण प्रयत्न या मजुरांचा असतो.

Web Title: Thousands of people enter the district through rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.