खड्ड्यांतून शोधावा लागतो इतवारा मार्ग
By Admin | Updated: April 17, 2016 02:00 IST2016-04-17T02:00:56+5:302016-04-17T02:00:56+5:30
सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

खड्ड्यांतून शोधावा लागतो इतवारा मार्ग
सेवाग्राम रेल्वे स्थानकापासूनच खड्डे : बसस्थानकाकडे जाणारा जवळचा रस्ता असूनही उपेक्षित
वर्धा : सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे. गिट्टी पूर्णपणे उखडून बाहेर आली आहे. परिणामी काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे सध्या इतवारा मार्ग हा अपघाताला स्वस्त झाल्याचे प्रवाश्यांमधून बोलल्या जात आहे.
सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. नियमित अपडाऊन करीत असलेल्या प्रवाश्यांचे वेळापत्रक हे रेल्वेवर अवलंबून असते. यामध्ये अनेक प्रवासी हे वर्धा बसस्थानकावर उतरून तात्काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघतात. यासाठी त्यांना आॅटोने इतवारा मार्ग सोयीचा पडतो. त्याचप्रकारे रेल्वेने सेवाग्राम स्थानकावर आलेल्या नागरिकांना तात्काळ वर्धा बसस्थानकावर जायचे असल्यासही हाच मार्ग जवळचा असतो. अशा प्रवाश्यांची संख्या ही जास्त असल्याने या मार्गावर आॅटो आणि दुचाकीचालकांची नेहमीच वर्दळ असते. पण या डांबरी रस्त्याची सध्यस्थितीत अत्यंत दैना झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडले आहे. गिट्टी रस्त्याच्या बाहेर जमा होत चालली आहे. परिणामी अपघाताची शक्यता या मार्गावर वाढत आहे.
किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या महत्वाच्या रस्त्याची पक्की दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणखी खराब होणार आहे. अश्यावेळी वाहनानेच काय तर पायी चालणेही कठीण होऊन बसणार आहे. वाहनामुळे गिट्टी उडून ती मागच्या वाहनचालकांना लागत असल्याचे प्रकारही येथे नेहमीच घडत असतात.(शहर प्रतिनिधी)
रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने वाहने होतात अनियंत्रित
रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने वाहने अनियंत्रित होऊन होणारे अपघात आता नित्याचेच झाले आहे. त्यातच समोरच्या वाहनाद्वारे गिट्टी उडून ती मागाहून येत असलेल्या वाहनावर उडून वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे खड्डे चुकवून वाट काढणे वाहनचालकांना जिकरीचे जाते. त्यातच आॅटोचालक भरधाव वाहने चालवित असतात. त्यामुळे आॅटोत बसलेल्या प्रवाश्यांनाही स्टेशन आणि बसस्थानकावर पोहोचेपर्यंत हादरे सहन करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास नकोसा होतो.