लोककला टिकविण्याकरिता सकारात्मक पाऊल हवे
By Admin | Updated: April 1, 2017 01:24 IST2017-04-01T01:24:30+5:302017-04-01T01:24:30+5:30
लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.

लोककला टिकविण्याकरिता सकारात्मक पाऊल हवे
गणेश चंदनशिवे : प्रकट मुलाखतीद्वारे साधला संवाद
वर्धा : लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. गायन करतांना आलेल्या विविध अडचणींवर मात करीत आपण पुढाकार घेतला आणि आजपर्यंतचा पल्ला गाठता आला. प्रकट मुलाखतीदरम्यान डॉ . गणेश चंदनशिवे श्रोत्यांशी संवाद साधत होते. यावेळी संवाहक म्हणून डॉ. सतीश पावडे यांनी त्यांना बोलके केले.
लोककलेचे उपासक आणि अभ्यासक असलेले आणि बाजीराव मस्तानी चित्रपटात मराठी लावणीची टाकणी आपल्या अनवट आवाजात सादर करणारे गायक डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी श्रोत्यांना लोककला व संस्कृतीतील गायनाविषयी अनेक अनभिज्ञ गोष्टी सांगितल्या. लावणी म्हणजे केवळ शृंगार हा अपसमज आहे. हा लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. लावणीच्या माध्यमातून आजवर समाज प्रबोधनाचे काम झाले आहे. लावणी ही तत्त्व आणि आध्यात्म सांगणारी आहे. आध्यात्माची जोड दिल्याने संत परंपरेतील अनेकांनी लावणीला सन्मान मिळवून दिला आहे , हे त्यांनी अनेक उदाहणे देत यावेळी स्पष्ट केले.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदीप दाते यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रकट मुलाखतीमध्ये चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. डॉ. सतीश पावडे यांनी प्रकट मुलाखत घेऊन विविध प्रश्नांची उकल करवून घेतली. भारूड, गौळण, लावणी सादर करून श्रोत्यांनाही चंदनशिवे यांनी मंत्रमुग्ध केले. लोककला आणि लोकसंस्कृती जिवंत ठेण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीने लोककलांकडे पहिले पाहिजे, लोककला जिवंत ठेवण्यासाठी सर्व साहित्य आणि कलेच्या विचाराची लोकं एकत्र आली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
या मुलाखतीमध्ये गायनाचे विविध पैलू डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या मुलाखतीमधून उलगडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश कदम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, इप्टा वर्धाचे अध्यक्ष राजू बावणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप दाते यांनी तर संचालन डॉ स्मिता वानखेडे यांनी केले.
याप्रसंगी डॉ. चंदनशिवे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रदीप दाते यांच्या हस्ते वर्धेकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकरिता मेघा देशमुख, रंजना दाते, सतीश सुपारे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळिले, आकाश दाते आणि आलोक निगम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.(प्रतिनिधी)