दीड महिन्यापासून मधुमेह तपासणी कीटच नाही
By Admin | Updated: November 19, 2014 22:46 IST2014-11-19T22:46:05+5:302014-11-19T22:46:05+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून मधुमेह (शुगर) तपासणीचे रक्त घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ग्लुकोज कीट संपल्या आहे. रूग्णालयात मधुमेहाची तपासणी करण्यासाठी

दीड महिन्यापासून मधुमेह तपासणी कीटच नाही
सेलू : येथील ग्रामीण रूग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून मधुमेह (शुगर) तपासणीचे रक्त घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ग्लुकोज कीट संपल्या आहे. रूग्णालयात मधुमेहाची तपासणी करण्यासाठी खेड्यापाड्यातून आलेल्या रूग्णांना परत पाठविल्या जात असल्याने रूग्णांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
येथील रूग्णालयात मधुमेह, रक्तदाब आदी आजाराच्या तपासण्या करण्यासाठी एनसीडी उपक्रमांतर्गत स्वतंत्र व्यवस्था आहे. कंत्राटदार पद्धतीवर डॉक्टर व अधिनस्थ कर्मचारी कार्यरत आहे. एमबीबीएस पदवी प्राप्त डॉ. मिना हिवलेकर यांच्या अधिनस्थ टिमच्या सह्याने रुग्णांना सेवा दिली जाते. मधुमेह(शुगर), रक्तदाब (बीपी) तपासून उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे.
धावत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना मधुमेह व रक्तदाब हे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे नियमित औषधी देण्याची व्यवस्था आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून मधुमेहाची चाचणी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कीटचा जिल्हा पातळीवरून पुरवठाच झाला नसल्याने तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना परत जावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे.
शासन आरोग्यसेवेच्या कितीही वल्गना करीत असले तरी गरिबांचा जीव टांगणीला लागत असल्याचा प्रत्यय येथे येत असतो. मागील महिन्यात अनेक दिवस टायफाईडची चाचणी करण्याच्या कीट नव्हत्या. मलेरियाची तपासणी करून मलेरिया आढळला नाही की, तपासणीची व्यवस्था नसल्याने अंदाज बांधून डॉक्टर रूग्णांना टायफाईडचे औषध सुरू करून द्यायचे. गरिबांवर योग्य निदान न करता त्यांना औषधी देण्यात आल्याने अनेक रूग्णांना आजार बरा होण्यापेक्षा वाढण्याच्या घटना घडल्या. यामुळे गरिबांच्या जीवाची फरफट होते असल्याचे निदर्शनास येत आहे.
तीस खाटांची व्यवस्था असलेल्या या रूग्णालयात तालुक्यातील सर्वसामान्य गरीब रूग्ण उपचारासाठी येतात. परंतु ऐन तापात दुरून आलेल्या रूग्णांवर योग्य औषधोपचार होत नसल्याने शासनाच्या चिठ्ठीमुक्त दवाखान्याच्या वल्गना कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मधुमेहाची तपासणी करण्याच्या साध्या कीट येथे गेल्या दीड महिन्यापासून उपलब्ध नाही. यामुळे या काळात किती रूग्णांना तपासणी न करता परत जावे लागले असेल याचा विचार करण्याची वेळ आहे. येथील यंत्रणा वरिष्ठांकडून कीटचा पुरवठाच झाला नसल्याने सांगत हातावर हात ठेवून चुपचाप बसून असतात. वाढत्या या आजारांच्या तपासणी व उपचाराची एनसीडी उपक्रमाअंतर्गत स्वतंत्र व्यवस्था असूनही क्षुल्लक व्यवस्थेअभावी शासनाच्या पाण्यासारख्या खर्च होणाऱ्या पैशाचा गरीब रूग्णांना कवडीचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनकर्ते व राज्यकर्ते झोपले काय, असा संतप्त सवाल रुग्ण व नागरिक उपस्थित करीत आहे.
शासनाने आवश्यक वैद्यकीय साहित्य नियमितपने पुरविने तसेच स्थानिक यंत्रणेने नसलेल्या साहित्याचा सातत्याने पाठपुरावा करने गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने असे प्रसंग येथे वारंवार उत्पन्न होतात. त्यामुळे नागरिक प्रशासनाप्रती व एकंदरीत वैद्यकीय व्यवस्थेप्रती नाराजी व्यक्त करतात.