लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय ऐन शेतीच्या हंगामात मशागतीच्या वेळेवर नागरिकांची वाघाने घाबरगुंडी उडवून दिली.खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्राला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. कॅटरिनाचे मोठे झालेले नऊ बछडे यासह युवराज व पिंकी या बहीण भावाची जोडी गत दोन महिन्यांपासून येथे मुक्काम ठोकून आहे.सुसूंद शिवारातील शेती ही मदना धरणाला लागून असल्याने पिंकी व युवराज यांनी या भागात आपले बस्तान ठोकले आहे. मात्र ही बहीण-भावाची जोडी आक्रमक नसल्याने मनुष्यावर हल्ला करीत नाही. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे; पण शेवटी वाघ म्हटले की भीती आलीच. त्यामुळे खरीपाचा हंगाम तोंडावर आला असताना नागरिक निरूत्साहाने शेतात जातात. पण डोक्यावर भीतीची टांगती तलवार असते.आमगाव येथे चेतन दादाराव खोब्रागडे या युवकाचा बळी घेणाऱ्या वाघाची अद्याप ओळख पटली नसली तरी कॅटरिनाच्या वयात आलेला बछडा असल्याचे बोलले जाते. सध्या तो वाघ माळेगाव (ठेका) व आमगाव शिवारात लोकांना रोज दर्शन देत आहे. शेतातील कड्याळुची सवंगणी करणे आता गरजेचे असताना नागरिकांत भीती निर्माण झाल्याने कामे रखडली आहे. वनविभागाने सदर भागात गस्त वाढवून नागरिकांना धीर दिला तरच शेती कसता येईल, अन्यथा यंदाचा हंगामात जमीन पडिक राहण्याखी भीती निर्माण झाली आहे.या हल्ल्यामुळे लोकांना ‘बाजीराव’ ची आठवण आली. तो बाजारगाव नजीक रस्ता अपघातात मरण पावला. त्याच्या सुरस कथा आजही त्या भागात ऐकायला मिळतात. कापूस वेचत असणाऱ्या महिलेच्या बाजूच्या ओळीतून जातानाही महिलेला कधी भय वाटले नाही. शेतात बांधलेल्या बैजजोडी जवळून जाताना त्याने कधी बैलजोडीकडे ढुकूंणही पाहिले नाही.या भागात कॅटरिनाचे नऊ बछडे असून आता पुन्हा तिने पिल्लांना जन्म दिल्याची माहिती आहे. पण ती सवयीप्रमाणे महिना-दीड महिना पिल्लाना बाहेर काढत नाही, असे वनविभाग सांगत आहे.वाघांचा बंदोबस्त करा यासाठी आमगाव, माळेगाव (ठेका), रामपूर, साईल, येणीदोडका, मरकसूर, गरमसूर, उमरविहिरी येथील लोकांनी सभेचे आज आयोजन केले आहे.
आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:48 IST
गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.
आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम
ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : नरभक्षक वाघ युवराज, पिंकी की अन्य; वनविभागही अनभिज्ञ