तात्पूरती शौचालये उभारणार
By Admin | Updated: October 20, 2016 01:11 IST2016-10-20T01:11:20+5:302016-10-20T01:11:20+5:30
शहरात घाण होऊ नये यासाठी सार्वजनिक शौचालये स्वच्छ करून घ्यावीत, दर तीन तासांनी ती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छक नेमावे.

तात्पूरती शौचालये उभारणार
वर्धा : शहरात घाण होऊ नये यासाठी सार्वजनिक शौचालये स्वच्छ करून घ्यावीत, दर तीन तासांनी ती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छक नेमावे. अतिरिक्त तात्पुरते शौचालय उभारावेत. मोर्चाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, डॉक्टरांची चमू तैनात करावी अशा सूचना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी जी.एच. भुगावकर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
दोषींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी
वर्धा : कोपर्डी प्रकरणातील आरोपीवरील खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय व महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे विकृत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार परत घ्यावा, ओबीसी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादाा नऊ लाख रुपये करण्यात येऊन शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी आदींच्या आरक्षणाचा बॅकलॉग त्वरित भरावा, शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबवून सर्वांना मोफत व समान शिक्षण देण्यात यावे, २०११ मध्ये करण्यात आलेली जातीनिहाय जनगणना जाहीर करण्यात यावी, देशातील अनेक भागांत निरपराध मुस्लिम, दलित आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना शासन करण्यात यावे, डॉ. दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी द्यावी आदी मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. गुरूवारी आयोजित मोटारसायकल रॅलीमध्ये सर्वस्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.