शिक्षकाने उचलला व्यसनमुक्ती जागृतीचा विडा
By Admin | Updated: February 4, 2016 02:11 IST2016-02-04T02:11:41+5:302016-02-04T02:11:41+5:30
मनुष्यच समाजात परिवर्तन घडवू शकतो. यासाठी जिद्द व परिश्रमाची गरज असते.

शिक्षकाने उचलला व्यसनमुक्ती जागृतीचा विडा
शेगाव (गोटाडे) येथील उपक्रम : चौकाचौकांत लावले पोस्टर
वर्धा : मनुष्यच समाजात परिवर्तन घडवू शकतो. यासाठी जिद्द व परिश्रमाची गरज असते. शेगाव (गोटाडे) या गावातील युवापिढी तंबाखुजन्य पदार्थाच्या आहारी गेल्याचे पाहून एका ध्येयवेड्या शिक्षकाने संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. त्या प्रयत्नांना यश येत असून गावातील नागरिक व्यसनाचा त्याग करू लागले आहेत.
सध्या गावातील युवक खर्रा, बिडी, सिगारेट, तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याचा संकल्प करीत आहेत. या उपक्रमामुळे आर्थिक बचत होत असून कुटुंब प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात व्यसनाधिनतेने दरवर्षी ३३ लाख लोक मृत्यूमुखी पडतात. व्यसन हे नैसर्गिक नसून मानवाला जडलेली विकृती आहे. तंबाखूमधील निकोटीनमुळे ८० प्रकारचे रोग होतात. आई-वडील, मित्र, गुरूजी तंबाखूसारखे पदार्थ खातात. परिणामी, मुलांनाही सवय जडताना दिसते. समुद्रपूर तालुक्यातील शेगाव (गो.) हे ७९८ लोकसंख्या असलेले आदिवासी बहुल गाव आहे. या गावात सुमारे २१० कुटुंबे असून त्यांचा आरोग्याचा खर्च वार्षिक एक ते दीड लाख रुपये आहे. तंबाखूजन्य पदार्थावर सुमारे १५ लाख रुपये खर्च होतो. युवकांना बऱ्याच तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडले होते. ही बाब अनिल कानकाटे या शिक्षकाच्या निदर्शनास आली. त्यांनी गडचिरोली येथील डॉ. अभय बंग यांच्या प्रेरणेतून गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. यासाठी घरोघरी जाऊन प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती केली. गावातील प्रत्येक चौकात व्यसनामुळे होणाऱ्या दुष्पपरिणामांचे फलक लावले. शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी कानकाटे यांनी तंबाखूजन्य पदार्थामुळे शरीराची कशी हानी होते, याची इत्यंभूत माहिती फलकांवर विषद केली. या जनजागृतीचा परिणाम अल्पावधीतच पाहावयास मिळाला. गावातील १५ ते २० टक्के लोकांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला. खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. शाळकरी मुले तंबाखूजन्य पदार्थ दिसताच त्याची विल्हेवाट लावतात. सध्या संपूर्ण गाव व्यसनमुक्तीच्या प्रवाहात सामील होत असल्याचे दिसते. या उपक्रमाचे जि.प. सदस्य भीमराव फुलझेले, केंद्रप्रमुख एन.एन. गिरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी तथा राजू भगत, सर्व सदस्य, मुख्याध्यापक शेळकी यांनी कौतुक केले. या कार्यात कानकाटे यांना सहकारी दुष्यंत चौखे, एस.आर. काळमेघ, लोभेष कुरसंगे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
युवापिढी व्यसनाच्या विळख्यात
आज युवापिढी व्यसनाच्या विळख्यात पुरती अडकली असून आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला बळी पडत आहे. व्यसनामुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे. जेवण, आरोग्यापेक्षा सर्वाधिक खर्च व्यसनावर होत आहे. यातून मिळत काहीच नाही, उलट आयुष्य कमी होते. शाळकरी मुलेही व्यसनाधिनतेच्या आहारी गेले आहे. यासाठी गाव व्यसनमुक्त करण्याचा अल्पसा प्रयत्न असल्याचे शिक्षक अनिल कानकाटे सांगतात.
१५ लाखांचा खर्च व्यर्थ
शेगाव (गो.) या गावाची लोकसंख्या ७९८ असून २१० कुटुंबे आहेत. येथील कुटुंबांचा वार्षिक खर्चाचा अंदाज काढला असता आरोग्यावर केवळ एक ते दीड लाख रुपये तर व्यसनावर १५ लाख रुपये खर्च होत असल्याचे समोर आले. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली. व्यसनावर खर्च निरर्थक आहे. यातून काही मिळत नाही. तो खर्च शिक्षणावर केल्यास मुलांचे भविष्य घडेल, हे पटवून दिले.