वर्धा : पिपरी (मेघे) नजीकच्या गणेशपूर येथे रविवारी आलेल्या वादाळाने गावात थैमान घातले. वादळात गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले. यात एक गाय व दोन बैलही जखमी झाले असून दोन लाखावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र या नुकसानीची पाहणी करण्याकरिता अद्याप एकही शासकीय कर्मचारी गावाकडे फिरकला नसून ग्रामस्थांना मदतीची अपेक्षा आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कडाक्याचं उन्ह होत. पण दुपारी १२ वाजताच्या नंतर अचानक वातावरणात बदल घडून आला. यानंतर सोसाट्याचा वारा वाहत वादळाला सुरुवात झाली. या वादळामध्ये गावातील तीन ते चार घरांवरील टिनपत्र उडाली. सूदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र टिनपत्रे उडल्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले. एकाएकी आलेल्या वादळामुळे नागरिकात भीती होती. या घटनेत जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. टिनपत्रे उडाल्याने अनेकांच्या घराच्या भींतीही पडल्या. त्यामुळे घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. त्याचवेळी दमदार पावसाने हजेरी लावली. अनेकांच्या घरातील धान्यही ओले झाले. वाळवणाकरिता टाकलेल्या धान्याची यामुळे नासाडी झाली. टिनपत्रे उडाल्याने घरातील फर्निचर ओले झाले. तसेच कपडे व घरातील धान्य आदीचे नुकसान झाले. यामुळे ग्रामस्थांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून या नुकसानीचा आढावा घेण्यात आला नाही. यामुळे येथील ग्रामस्थांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल का या विवंचनेत नागरिक आहे.
वादळामुळे घरावरील टिनपत्रे उडाली
By admin | Updated: June 4, 2014 00:16 IST