शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तालुका मेळावा
By Admin | Updated: June 11, 2014 23:31 IST2014-06-11T23:31:22+5:302014-06-11T23:31:22+5:30
कारंजा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आष्टी तालुका मेळावा गुरुदेव सेवा मंडळ सभागृह

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तालुका मेळावा
वर्धा : कारंजा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आष्टी तालुका मेळावा गुरुदेव सेवा मंडळ सभागृह कारंजा येथे पार पडला़ मेळाव्यास कारंजा तालुक्यातील १५० महिला उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ झाला़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जायदा हुसैन, सुनीता निंभारकर, दिलीप शापामोहन, महादेव गारपवार अमरावती, सिटूचे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, भैय्या देशकर, लिला रामटेके, संध्या संभे आष्टी, संगीता मरस्कोल्हे कारंजा आदी उपस्थित होते़ मेळाव्याचे उद्घाटन दिलीप शापामोहन यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी सीताराम लोहकरे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका जनहित याचिकेतून पश्चिम बंगाल सरकारद्वारे अनेक वर्षांपासून राबविल्या जात असलेली मध्यान्ह भोजन योजना २००४ मध्ये प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता विस्तारीत करण्यात आली़ भारतातील मध्यान्ह भोजन ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. देशभरातील १३ लाख शाळांतील विद्यार्थी लाभ घेतात. यात १२ कोटी मुले दररोज दुपारचे जेवण घेतात. यावर वार्षिक १३ हजार २१५ हजार कोटी रुपये सरकार खर्च करते. असे असताना जगातील सर्वाधिक ४० टक्के कूपोषित मुले भारतात आहेत. ही सर्व गरिबांची मागास जमातींची मुले आहेत. भारत सरकारने योजना सुरू केली खरी; पण त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाही. प्रत्येक शाळेत स्वतंत्र पाकगृह नाही. स्वच्छ पिण्याचे पाणी नाही. विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्वतंत्र खोली, भोजन गृह नाही. यामुळे शाळेतील एखाद्या पडक्या खोलीत अन्न शिजवावे लागते. मुलांना उघड्यावर जेवावे लागते. या समस्या दूर करून मध्यान्ह भोजन निर्मितीचे काम करणाऱ्या महिलांना दरमहा १० हजार रुपये मानधन द्यावे, सर्व सोई-सवलती मिळाव्या. सामाजिक सुरक्षा मिळावी. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
भैय्या देशकर, महादेव गारपवार, दिलीप शापामोहन, अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका अर्चना मोकाशी, रंजना सहारे, संजय भगत, संजय देशमुख यांनी समस्या मांडल्या. शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. मेळाव्याला नीता डोंगरे, प्रमीला घागरे, देवका बागडे, मरस्कोल्हे आदींनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)