ज्ञानाला क्षितिजापलीकडे पोहचवा
By Admin | Updated: June 8, 2014 00:07 IST2014-06-08T00:07:00+5:302014-06-08T00:07:00+5:30
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून तंत्रज्ञानाची उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे

ज्ञानाला क्षितिजापलीकडे पोहचवा
आंतरराष्ट्रीय परिषद : वाढई यांचे आवाहन
वर्धा : ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून तंत्रज्ञानाची उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे पोहचविण्याचे कार्य याप्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून होईल, असे मत पुणे येथील एम. आय. टी. चे प्राचार्य डॉ. वाढई यांनी केले.
सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय येथे क्वॉलिटी अपग्रेडेशन इन इंजिनिअरींग सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर नांदेडच्या एस. जी. जी. एस चे प्रा. जामकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डि. के. अग्रवाल, प्राचार्य डॉ. एम. ए. गायकवाड, परिषदेचे समन्वयक प्रा. विकल इंगळे, संयोजक एम. एन. ठाकरे, सचिव आर. एस. मंगळरुकर उपस्थित होते. यानंतर जामकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञान व संशोधनाला नवा आयाम प्राप्त होईल, यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक युगात ज्ञानाला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. आणि परिषदेच्या माध्यमातून ते साध्य होत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली. समन्वयक प्रा. विकल इंगळे यांनी प्रास्ताविक केले. अद्यावत तंत्रज्ञान, संशोधन यांचा मेळ बसावा, संशोधनाची तंत्रे संशोधनकर्त्यांना अवगत व्हावी, नवीन ते समाजासमोर यावे यासाठी महत्त्वपूर्ण अशी परिषद असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट तांत्रिक निंबध सादर करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञानाला क्षितीजापलीकडे पोहचविण्यासाठी सदर उपयुक्त असल्याचे मत सहभागी मान्यवर व विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.(स्थानिक प्रतिनिधी)