समुद्रपूरच्या उद्धट गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा
By Admin | Updated: June 19, 2016 01:57 IST2016-06-19T01:57:09+5:302016-06-19T01:57:09+5:30
समुद्रपूर पंचायत समितीत कार्यरत गट विकास अधिकारी विजय लोंढे हे सातत्याने शिक्षक आणि संघटना प्रतिनिधींना उद्धटपणे बोलून...

समुद्रपूरच्या उद्धट गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा
सीईओंना निवेदन सादर : प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
वर्धा :समुद्रपूर पंचायत समितीत कार्यरत गट विकास अधिकारी विजय लोंढे हे सातत्याने शिक्षक आणि संघटना प्रतिनिधींना उद्धटपणे बोलून हुकूमशाहीचे धोरण अवलंबित अपमान करीत असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. या निवेदनात सदर अधिकाऱ्यांवर करण्याई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर सदर अधिकाऱ्यांकडून उत्तर मागविण्याच्या सूचना सीईओ गुंडे यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत शिक्षकांचे एप्रिल २०१६ च्या वेतनास होणारा संभाव्य विलंब लक्षात घेता शिक्षण विभागातील वेतन देयक विभागात कर्मचारी नियुक्त करून वेतन तातडीने करण्याची कार्यवाही करावी यासाठी शिक्षक संघाचे प्रतिनिधी गटविकास अधिकाऱ्याची भेट घेण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडून शिक्षकांना उद्धट वागणूक देण्यात आली.
वेतनास होत असलेल्या विलंबामुळे संघटनेच्यावतीने टाळ मृदंग गजर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत वर्धा जिल्ह्यातील शिक्षक वेतन व पैशासाठी फार दरिद्री असल्याचे दिसते, असे वक्तव्य गटविकास अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांकरिता ५ जून २०१६ रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात आलेले शिक्षकवृंद उन्हापासून बचावाकरिता कार्यालयात आश्रय घेत होते. तर त्यांनाही या अधिकाऱ्यांकडून गेट आऊट म्हणून हाकलून लावण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला.
समुद्रपूर शिक्षण विभागात शिक्षकांच्या वेतन अपहार प्रकरणी दोषी लिपीकावर सदर गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संदर्भात पोलिसात तक्रारही नोंदविली नाही. यामुळे सदर अपहार प्रकरणी गटविकास अधिकारी पं.स. समुद्रपूर यांची भुमिका संशयास्पद असल्याचे संघाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर अधिकारी शिक्षकांच्या भावनांशी खेळत असून या संदर्भात मोठा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील, असा इशारा शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला असून या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)