‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
By Admin | Updated: April 18, 2016 04:32 IST2016-04-18T04:32:51+5:302016-04-18T04:32:51+5:30
रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला.

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
वर्धा : रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई द्वेषपूर्ण असल्याचा आरोप करीत लाठीहल्ला करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विश्वहिंदू परिषदेच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेतून केली.
वर्धा शहरात विविध भागातून रामनवमी शोभायात्रा काढण्यात आली. यात शास्त्री चौक परिसरातील शोभायात्रा सोशालीस्ट चौकाकडे जाण्याकरिता निघाली असता वेळेचे कारण काढून पोलिसांनी यात सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला केला. पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी वंजारी चौक परिसरात सुरू असलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात जेवण करीत असलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
वास्तविकतेत रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने शांतता बैठकीत उन्हाच्या कारणारने मिरवणुकीला एक तासाच्या अधिक अवधीची मागणी केली होती. ती प्रशासनाच्यावतीने मान्य करण्यात आली होती. असे असताना पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कारवाईकरिता न्यायालयात जाणार
४या लाठीहल्ला प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस विभागाकडून दुर्लक्ष झाल्यास विश्व हिंदू परिषद न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी प्रशांत बुरले यांनी दिली. येथून आदेश आणत या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
चार्ली पथकावर वचक आवश्यक
४शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने चार्ली पथक तयार करण्यात आले. मात्र या चार्ली पथकाचा लाभ होण्याऐवजी त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. हे पथक आपले कार्यक्षेत्र सोडून काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पथकावर पोलीस विभागाने वचक बसवावा, अन्यथा त्यांना नागरिकांकडून चोप मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे न.प. उपाध्यक्ष कुलधरीया म्हणाले.