२०० रुपये घ्या, जमा रक्कम आणून द्या!
By Admin | Updated: February 2, 2016 01:58 IST2016-02-02T01:58:52+5:302016-02-02T01:58:52+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेतली जात आहेत;...

२०० रुपये घ्या, जमा रक्कम आणून द्या!
मनरेगा योजनेत गौडबंगाल : नाव मजुरांचे, काम मात्र जेसीबीने
रूपेश मस्के कारंजा (घा.)
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेतली जात आहेत; पण ही योजना कुरण ठरत असल्याने रोजगार उपलब्धच होत नसल्याचे दिसते. पांदण रस्त्यांची कामे जेसीबीने करून बोगस मजूर दाखविले जातात. यात संबंधितांना २०० रुपये घ्या आणि बँक खात्यात जमा झालेली रक्कम आणून द्या, असे आमिष देत गैरप्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
मनरेगांतर्गत पांदण रस्त्याचे काम जेसीबीने करून बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयांचा गैरप्रकार करण्यात आला. या कामावर दाखविलेल्या मजुरांना जमा झालेल्या रकमेतील २०० रुपये घेऊन उर्वरित रक्कम परत करा, अशी ताकीदच दिली जात असल्याचे सांगण्यात आले. काकडा येथे मनरेगांतर्गत मंजूर पांदण रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाला. याबाबत माजी उपसरपंचासह नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली; पण तीन महिने लोटूनही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे चौकशीतही घोळ होत असल्याची ओरड होत आहे. गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत, काकडा येथे पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. हे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करायचे होते. या मागे नागरिकांच्या हाताला काम मिळावे, हा उद्देश होता; पण बोगस मजुरांच्या नावाने लाखो रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला. सदर काम रात्रीच्या काळोखात करण्यात आल्याचेही नमूद होते. असे गंभीर आरोप असताना गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे सौजन्य दाखविले नाही. या कामाच्या नावावर श्रीमंतांच्या नावाने मस्टर भरून मजुरी काढण्यात आली. जॉब कार्ड असलेल्यांना कामे दिली नसल्याचेही समोर आले आहे.
या कामाबाबत माहिती अधिकारात प्राप्त माहितीनुसार रात्रभरात जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने मुरूमाची उचल करून पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कामावर शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या नावे मजुरी काढण्यात आल्याचेही समोर आले. खात्यात जमा झालेली रक्कम संबंधितांना सांगत परत घेतल्याचेही उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
तालुक्यातील अन्य गावांतही मनरेगामध्ये घोळ
कारंजा शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे मनरेगा अंतर्गत करण्यात आली आहेत. चार ते पाच कंत्राटदारांनी ही कामे अशाच पद्धतीने नाममात्र मजूर दाखवून यंत्रांद्वारे पूर्ण केल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत; पण त्या कामांचीही कधीच चौकशी झाली नसल्याचे दिसून येते. खासगी व्यक्ती ठेवून त्याच्यामार्फत मजूर गोळा केले जात असल्याचेही चित्र परिसरात पाहावयास मिळते.
मनरेगाची कामे करताना मजुरांना काम कमी, आराम अधिक, अशीही प्रलोभने दिली जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित यंत्रणा अशाच पद्धतीने मजूर गोळा करून त्यांना अल्प मजुरी देत उर्वरित रकमेचा गैरप्रकार करीत असल्याचे उघड झाले आहे. पंचायत समिती अंतर्गत केल्या जाणाऱ्या मनरेगाच्या कामाची सर्वत्र अशीच स्थिती असल्याचे बोलले जाते. तक्रारी करूनही चौकशी वा कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ जेरीस आले आहेत.
इतर कामांवर गेलेल्या मजुरांना अधिक परिश्रम करावे लागतात; पण मनरेगाची कामे असली की काम कमी आणि आराम अधिक असतो. यामुळे मजूरही मनरेगा अंतर्गत चालणाऱ्या कामांवर जाणेच पसंत करीत असल्याचे दिसून येते. हा प्रकार संपूर्ण तालुक्यातच सुरू असल्याचे दिसते.
बऱ्याच ठिकाणी तर एकत्र गोळा होऊन मजूर गप्पा हाकतानाही दिसून येतात. त्यांच्याकडून काम करून घेणारी यंत्रणाही शासनाचा निर्धी खर्ची होत असल्याने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. मनरेगांतर्गत होणाऱ्या या गैरप्रकारांकडे लक्ष देत कारवाई करणेच अगत्याचे ठरते.
सदर कामाची चौकशी करण्याच्या सूचना मनरेगा विस्तार अधिकारी व शाखा अभियंता यांना दिल्या आहेत. त्यांनी चौकशी करून बयाण नोंदविलेले आहे. अहवाल लवकरच सादर केला जाईल. त्या अहवालानुसार कारवाई होईल.
- बी.डब्ल्यू. यावले, गटविकास अधिकारी, पं.स. कारंजा (घा.).