हयात शेतकऱ्याला मय्यत तर मृताला दाखविले जिवंत

By Admin | Updated: July 17, 2014 00:15 IST2014-07-17T00:15:19+5:302014-07-17T00:15:19+5:30

मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा सपाटा लावला होता.

Surviving the farmer, the dead showed to the dead | हयात शेतकऱ्याला मय्यत तर मृताला दाखविले जिवंत

हयात शेतकऱ्याला मय्यत तर मृताला दाखविले जिवंत

अतिवृष्टी अनुदान वाटपात हेरोफेरी : मदत लाटण्यासाठी केला अफलातून प्रकार
अमोल सोटे -आष्टी (श़)
मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा सपाटा लावला होता. राज्य शासनाने धास्ती घेत अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची घोषणा केली. शासनाने पैसाही पाठविला; पण वाटप करणारी यंत्रणा बेताल व अनागोंदी धोरण राबवित असल्याने नवीनच किस्से उघड होत आहे़
तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक या तीनही कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पाहणीतून यादी तयार झाल्याची नोंद कागदोपत्री आहे. मौजा माणिकवाडा येथील यादी शेतकऱ्यांनी पाहिली तेव्हा धक्काच बसला. शेतकरी गजानन सीताराम कुंभरे हे जिवंत आहेत़ त्यांना ०.५० आराजी मदत टाकण्यात आली; पण यादीत मय्यत दाखविले. आपल्याला अद्याप अनुदान का मिळाले नाही म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी डॉ. वाय.एस. जुमडे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी यादी पाहून गजानन कुंभरे मय्यत असून त्यांचा दाखला पाहिजे, असे बेजबाबदार व उर्मट उत्तर दिले. शेतकरी मीच गजानन असल्याचे पुरावे दाखवत होता; पण त्याचे कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.
यानंतर नर्मदा महादेव राऊत यांच्या नावाने ०.३० हे.आर. मदत दाखविण्यात आली. नर्मदाबाई मय्यत आहेत़ त्यांना जिवंत दाखविण्यात आले. शेतकरी कृषी सहायक शेळके यांच्याकडेही गेले़ त्यांनीही कुणाचेच म्हणणे ऐकून घेतले नाही. या यादीवर माणिकवाडा येथील तलाठ्यांची स्वाक्षरी आहे.
अतिवृष्टी व गारपीट या दोन्ही मदत वाटपात गौडबंगाल आहे. संत्रा, मोसंबी नाही, अशांनाही मदत देण्यात आली. बोगस यादी तयार करून मदत वाटप करणारे कर्मचारी लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मौजा माणिकवाडा येथील अनेक शेतकरी चुकीच्या यादीमुळे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत़ तारासावंगा येथील प्रगतशील शेतकरी विनोद आखरे यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या समक्ष बोगस यादीचा प्रकार सांगितला. यात दोषी असलेली मंडळी मात्र बिनधास्त आहे.
एकाच कुटुंबात ३ लाख ४५ हजार रुपये मदत देण्यात आली तर दुसरीकडे १ हजार ५०० रुपये अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा सर्व घोळ तालुका कृषी अधिकारी डॉ. जुमडे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जुमडे यांची नागपूर येथे बदली झाल्याने प्रकरणावर पडदा पडला आहे. मौजा माणिकवाडाचे कृषीसहायक शेळके व तलाठी बानाईत यांना मय्यत नाव दिसले नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

Web Title: Surviving the farmer, the dead showed to the dead