सुकळीच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
By Admin | Updated: February 4, 2016 02:16 IST2016-02-04T02:16:08+5:302016-02-04T02:16:08+5:30
सेलू तालुक्यातील सुकळी (बाई) येथे शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे आहे. धाम नदी ओलांडून शेतावर जावे लागते.

सुकळीच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
नदी पात्र ओलांडण्यासाठी ट्यूब आणि दोराचा आधार
आकोली : सेलू तालुक्यातील सुकळी (बाई) येथे शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे आहे. धाम नदी ओलांडून शेतावर जावे लागते. हा जीवघेणा प्रवास शेतकऱ्यांना ट्यूब व दोराचा आधार घेऊन कित्येक पिढ्यांपासून करावा लागत आहे.
सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे खर्डा शिवारात आहे. शेतात जायला सोईचा पर्यायी रस्ता नाही. गिरनाळा मार्गे जायचे म्हणजे लांबचा प्रवास आहे. शेतात ये-जा करतानाच दिवस जातो. यामुळे महिला, पुरूष, लहान मुले नदी ओलांडण्यासाठी ट्यूबचा वापर करतात. नदीच्या काठावर दोन ट्यूब शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून ठेवले आहे. नदीच्या दोन्ही काठावर दोर बांधला आहे. नदीला वर्षभर पाणी असते. यामुळे शेतकरी जीव मुठित घेऊन प्रवास करतात. वजनाने हलके शेती साहित्य ट्युबद्वारे वाहून नेतात. लहान बालकांनाही जीवघेणी सर्कस करावी लागत आहे. महिला शेतकरी मोहिनी पतेरिया यांना भीती वाटत नाही काय, असे विचारले असता ‘एक दिन मरणाही तो है!’ असे हताश उद्गार त्यांनी काढले.(वार्ताहर)
बैलजोडी शेतातच ठेवावी लागते. यामुळे चोरीला जाईल का, ही धास्ती असते. शेतातील धान्य व कापसाचे गाठोडे बैलगाडीची भरती होईपर्यंत शेतात ठेवावे लागते. धामनदीवर पूल झाला तर हा त्रास थांबू शकतो. लोकप्रतिनिधींनी अनेकदा पूल निर्मितीची स्वप्ने दाखवली; पण अद्यापही हालचाल नाही.