वादळाने केळीची बाग जमीनदोस्त
By Admin | Updated: July 27, 2014 00:14 IST2014-07-27T00:14:06+5:302014-07-27T00:14:06+5:30
संततधार वादळी पाऊस अनेकांना आर्थिक फटका देऊन गेला. पावसाच्या प्रतिक्षेनंतर उशिरा का होईना; पण पाऊस आला. शेतकरी जोमाने पेरणीला लागला; पण या वादळी पावसाने कपाशी, सोयाबीन,

वादळाने केळीची बाग जमीनदोस्त
सेलू : संततधार वादळी पाऊस अनेकांना आर्थिक फटका देऊन गेला. पावसाच्या प्रतिक्षेनंतर उशिरा का होईना; पण पाऊस आला. शेतकरी जोमाने पेरणीला लागला; पण या वादळी पावसाने कपाशी, सोयाबीन, भाजीपाला व सेलू तालुक्याचे केळीचे अस्तित्व टिकविण्याऱ्या बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रेहकी येथील शेतकऱ्याला तर सुमारे साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला़ यामुळे पूरते हादरले आहेत़ शेताची पाहणी करण्यासाठी अधिकारीही टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे़
रेहकी येथील शेतकरी बाबा ज्ञानेश्वर धानकुटे यांची २५ ते ३० किलो वजनाचे केळीचे घडांनी लदबदलेली बाग वादळामुळे जमिनदोस्त झाली़ यामुळे सदर कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. सदर शेतकरी महसूल विभागाकडे केळीची बाग बघायला या, नुकसान भरपाई मिळावी म्हणून काहीतरी करा, असा टाहो फोडत सेलूत चकरा मारत आहे; पण त्याला सांत्वना देण्यासही कुणाला वेळ नसल्याचेच दिसून आले़ सदर शेतकऱ्याची दोन एकरातील हाती आलेली केळीची बाग वादळी पावसामुळे कोलमडली़ यात त्याला साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला. सदर शेतकऱ्याकडे पाच एकर ओलित व आईच्या नावे साडेतीन एकर कोरडवाहू जमीन आहेत़ यात दोन भावांचा नऊ सदस्यांचा प्रपंच आहे. शेतीत अख्खे कुटूंब कष्ट करते. केळी हेच त्यांचे मुख्य व नगदी पैसा देणारे पीक आहे. तेही हातचे गेले तर आता पूढील कार्य करायचे कसे, लोकांचे पैसे द्यायचे कुठून असे गंभीर प्रश्न बाबा धानकुटे यांच्यापूढे उभे ठाकले आहेत़
गावातील तलाठ्याला माहिती देण्यात आली; पण त्यांनीही नुकसानाची पाहणी करण्याचे सौजन्य दाखविले नाही़ महसूल व कृषी विभागाने सूचना मिळताच त्याच्या बागेला भेट देणे, पंचनामा करणे व शासन पाठीशी असल्याचा धीर देणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही फिरकले नाही़ शेतकरी इच्छामरणाची भाषा बोलू लागल्याने त्याची मानसिकता किती टोकाला पोहोचली आहे, हे समजून घेणे सध्या गरजेचे झाले आहे़ शेतकरी दोन दिवसांपासून महसूल विभागात चकरा मारत आहे; पण बघु, करू, अमक्या दिवशी शेतावर येऊ, असे सांगून शेतकऱ्याची बोळवण केली जात आहे़ कायद्याच्या चौकटीत सदर शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई द्यायची, हा शासनाचा भाग असला तरी किमान अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्याला न्याय देणे गरजेचे आहे़
महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रेहकी येथील शेतकऱ्याच्या केळीच्या बागेमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करावी व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी माणगी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)