राज्य परिवहन महामंडळाचा ‘अश्वमेध’ प्रवाशाविना
By Admin | Updated: November 19, 2016 01:10 IST2016-11-19T01:10:44+5:302016-11-19T01:10:44+5:30
बिनावाहक, बिना थांबा अशी सुविधा परिवहन महामंडळाने या पूर्वी आणली. पण बिनाप्रवाशी एस.टी.बस पाहून

राज्य परिवहन महामंडळाचा ‘अश्वमेध’ प्रवाशाविना
महिन्याकाठी लाखोंचा चुना : वातानुकुलित बसला अत्यल्प प्रतिसाद
अरुण फाळके कारंजा (घाडगे)
बिनावाहक, बिना थांबा अशी सुविधा परिवहन महामंडळाने या पूर्वी आणली. पण बिनाप्रवाशी एस.टी.बस पाहून अनेकांना आता परिवहन महामंडळाने प्रवाशाविना एसटी बस अशी संकल्पला अंमलात आणली काय असे वाटू लागले आहे. खासगी लक्झरी बसच्या अवैध वाहतुकीवर तोडगा काढण्याकरिता म्हणून परिवहन महामंडळाने पुणे-चंद्रपूर अशी वातानुकुलीत व्हॉल्वो बससेवा सुरू केली. या बसला ‘अश्वमेघ’ असे नाव दिले. या आकर्षक व महागड्या बसमध्ये औरगांबादनंतर प्रवासी नसतात. बस अक्षरश: बिना प्रवासी धावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. यामुळे या बसफेरीवर होत असलेला खर्च एका चालकाच्या व वाहकावर आणि डिझेलवरच होत असल्याचे बोलले जात आहे.
नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा आरामशीर प्रवास व्हावा आणि खासगी ट्रॅव्हल्सकडे जाणारा प्रवासी परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे आकर्षीत व्हावा या उद्देशाने गत सहा महिन्यांपासून ही वातानूकुलीत बससेवा ‘अश्वमेध’ नावाने सुरू केली. अशीच एक बस पुणे-चंद्रपूर या नावाने गत तीन महिन्यांपासून सुरू आहे. ही बस पुण्यावरून सकाळी ६.३० वाजता निघते तर चंद्रपूरवरून सायंकाळी ७ वाजताची तिची वेळ आहे. बसमध्ये ५१ आसन आहेत. सिट्स आरामदायी व आकर्षक आहेत. या बसने पुणे ते चंद्रपूर या प्रवासाला १८ तासांचा कालावधी लागतो.
या बसची टिकीट एक्सप्रेस बसेस पेक्षा दुप्पट आहे. चंद्रपूरचे तिकीट १९०० रुपये आहे. या अवाढव्य तिकीट दरामुळे औरगांबाद नंतर या बसला प्रवाशी मिळत नसल्याचे दिसून आले आहे. परतीच्या प्रवासात ही बस राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कारंजा येथील बसस्थानकावर पोहोचली असता या बसमध्ये अमरावती येथून नागपूरला जाण्याकरिता केवळ एकमेव प्रवाशी असल्याचे दिसून आले आहे. औरगांबाद ते अमरावती या प्रवासात या बसमध्ये केवळ तीन प्रवासी बसले असल्याची माहिती वाहकाने दिली.
लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या नावावर परिवहन महामंडळाच्यावतीने लाखोंचा तोटा सहन केल्या जात आहे. तर दुसरीकडे ज्या लाल गाड्यांना ग्राहक आहे त्यावर कुठलाही खर्च महामंडळाच्यावतीने केल्या जात नाही. ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याच जुन्या आणि खिळखिळ्या बसमधूनच प्रवास करावा लागतो आहे. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महिन्याकाठी सरासरी साडेबारा लाखांचा तोटा
या बसमध्ये असलेल्या दोन चालकांचा मासीक पगार अंदाजे एक लाख रुपये, वाहकाचा पगार ५० हजार तर पुणे ते चंद्रपूर वाहतुकीसाठी ४५ हजार रुपयांचे ७०० लिटर लागते. बसची किंमत आणि व्यवस्थापनाचा खर्च वेगळा. याचा हिशेब काढल्यास महिन्याकाठी १५ लाख रुपयांचे डिझल, २ लाखांचा व्यवस्थापन खर्च आणि दीड लाखांचा कर्मचारी खर्च याप्रमाणे एकूण १८ लाख ५० हजारांचा खर्च महिन्याकाठी या बसवर होत आहे. मिळकत मात्र महिन्याकाठी पाच लाखाचीही नाही. म्हणजे दर महिन्याला साडेबारा लाख रुपयांचा तोटा या एका बससाठी महामंडळाला होत आहे. याकडे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.