‘स्टार्स’ तंत्रप्रणालीने अवघड जखमेवरही त्वचारोपण
By Admin | Updated: June 20, 2015 02:33 IST2015-06-20T02:33:00+5:302015-06-20T02:33:00+5:30
एकदा झालेली जखम लवकर भरुन निघेल याची शाश्वती कमीच. महागड्या उपचाराने ती भरुन काढण्याचे तंत्रज्ञानही विकसीत आहे.

‘स्टार्स’ तंत्रप्रणालीने अवघड जखमेवरही त्वचारोपण
श्रीवास्तव यांचे अभिनव संशोधन : सावंगी रुग्णालयात २४ रुग्णांवर यशस्वी उपचार
वर्धा : एकदा झालेली जखम लवकर भरुन निघेल याची शाश्वती कमीच. महागड्या उपचाराने ती भरुन काढण्याचे तंत्रज्ञानही विकसीत आहे. मात्र यावर एक पाऊल पुढे टाकत दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता केवळ इंजेक्शनच्या आधारावर अल्पावधीत ती जखम भरुन काढणारी नवी तंत्रप्रणाली शोधून काढली आहे.
या तंत्रज्ञानाला ‘स्टार्स’(संदीपस् टेक्निक फॉर असिस्टेड रिजनरेशन) असे नाव देण्यात आले आहे. रुग्णांच्या अवघड जखमांमध्ये नव्या त्वचारोपणाकरिता या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वैद्यकशास्त्राच्या इतिहासात कदाचित हा पहिलाच नवनिर्मित प्रयोग असावा. आॅस्टिओआथ्रायटिस, नाजुक अस्थिभंग, अस्थिकांडावरील जखमा, आकस्मिक दुखापतीवरील त्वचा पुर्ववत करण्याकरिता प्रथमच ही पद्धत विकसित करण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीवास्तव यांनी दिली. कुलपती दत्ता मेघे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. दिलीप गोडे यांचे प्रोत्साहन महत्वाचे ठरले, अशी माहितीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
रुग्णालयाद्वारे आदिवासी परिवारांसाठी शालिनी माता, कुमार व बाल आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ येत्या सोमवारपासून सेलू तालुक्यातील टाकळी(झडशी) येथून करण्यात येणार आहे. सालई कला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावे, झडशी केंद्रांतर्गत २० गावे, खरांगणा केंद्रातील १४ तर कान्होली आरोग्य केंद्रातील २४ गावांतील आदिवासी परिवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गर्भवती माता, बाळंत माता, नवजात शिशूंची आरोग्य तपासणी व किशोरवयीन मुलांमुलींचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयुर्विज्ञान संस्थेचे कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली. तसेच मेघे रुग्णालय व रोटरी क्लबतर्फे स्तनांच्या कर्करोग तपासणीसाठी फिरती मॅमोग्राफी मोफत सेवा सुरु करणार असल्याचेही मेघे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)
औषधोपचार बाद, इंजेक्शनद्वारे उपचार
ही उपचाराची पद्धत अगदी साधी आणि सोपी असून रुग्णावर औषधपचाराचीही गरज नाही. रुग्णाच्याच रक्ताचा नमुना घेऊन त्यातील रक्तपेशीच्या आधारे उपचार केले जातात. या तंत्रज्ञानामुळे उपचारबाह्य व्रण, पोषणाअभावी निर्माण झालेले अल्सर, बेडसोर्स, त्वचेपर्यंत जखम पसरलेले अस्थिभंग, पेशीजालांच्या मोठ्या दुखापती आदींवर उपचार करणे सहज शक्य झाले असून २४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
या उपचारासाठी रुग्णाला महागडी औषधे अथवा अवघड शस्त्रक्रियांची गरज भासत नाही. तसेच कोणतेही विपरित परिणाम जाणवणार नाही, असेही डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.