दुबार पेरणीचे संकट कायमच
By Admin | Updated: June 28, 2014 23:42 IST2014-06-28T23:42:19+5:302014-06-28T23:42:19+5:30
गत १५ दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता पाऊस कोसळणार या आशेने काही ठिकाणी कपाशीचा पेरा करण्यात आला. पण हा पाऊसही मृगजळ ठरला. पावसाने दडी मारल्याने पुन्हा पावसाची

दुबार पेरणीचे संकट कायमच
शेतकरी चिंतेत : जोरदार पाऊस अद्याप नाहीच
वर्धा : गत १५ दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता पाऊस कोसळणार या आशेने काही ठिकाणी कपाशीचा पेरा करण्यात आला. पण हा पाऊसही मृगजळ ठरला. पावसाने दडी मारल्याने पुन्हा पावसाची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यात शुक्रवारी पावसाने पुन्हा थोडीशी हजेरी लावली. हा पाऊस जिल्हाभर नाही. या पावसाने जमीन ओली झाली मात्र त्याचा उपयोग नाही. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेले, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत असून दुबार पेरणीचे संकट कायम आहे.
यंदा हवामान खात्याने पाऊस कमी आणि अनियमित येईल असा अंदाज व्यक्त केला. एरव्ही हवामान खात्याचा खरा न होणारा अंदाज यंदा खरा ठरला. मृग सरून आर्द्रा नक्षत्र सरत आले तरीही जोमदार पाऊस नाही. जोपर्यंत शेतातून पावसाचे लोट निघत नाही तोपर्यंत पेरणी करण्यास शेतकरी धजावत नाही. त्यामुळे सर्वच तालुक्यातील पेरण्या लांबल्या. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. पण विहिरीतील पाण्याची पातळी खालावत असल्याने किती दिवस सिंचन करणार हा प्रश्न पडला होता. तसेच काही कोरडवाहू शेतकऱ्यांनीही आता पाऊस येईलच या आशेने पेरण्या केल्या होत्या. आधीच कर्जाने पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच उधारित बियाणे घेतले आहे. त्यामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार उभी होती. शुक्रवारच्या पावसाने तुर्तास तरी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुबार पेरणीची टांगती तलवार अद्यापही कायम असून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)