पुलगाव वगळता सर्वत्र सुरळीत वाहतूक
By Admin | Updated: May 1, 2015 01:38 IST2015-05-01T01:38:24+5:302015-05-01T01:38:24+5:30
परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर..

पुलगाव वगळता सर्वत्र सुरळीत वाहतूक
वर्धा : परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायदा रद्द करून रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक आणत असल्याचे समोर येताच राज्यभर परिवहन विभागात गुरुवारी बंद पुकारण्यात आला. वर्धेतही त्याचे पडसाद दिसले. मात्र पुलगाव वगळता सर्वत्र शांतता होती. पुलगाव आगारातील पाच बसगाड्या चालकांनी अडविल्याने त्या दोन तास उशिरा सोडण्यात आल्या. यामुळे काही फेऱ्यांत अनियमितता दिसून आली.
वर्धा, तळेगाव, हिंगणघाट व आर्वी आगारातील सर्वच बसगाड्या सुरळीत सुटल्या. येथे कोणत्याही प्रवाशाला त्रास झाला नाही. प्रारंभी काही चालकांनी गाड्या नेण्यास विरोध दर्शविला; मात्र या विधेयकावर केवळ चर्चा सुरू असून ते अद्याप पारीत झाले नसल्याची माहिती मिळताच त्यांनी आपापल्या बसगाड्या काढल्या. यामुळे वर्धेत या बंदचा विशेष परिणात दिसून आला नाही.
पुलगाव येथील पाच चालकांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिल्याचे दिसून आले. त्यांनी बसस्थानकावरून गाड्या काढण्यास नकार दिला. यामुळे या आगारातील पाच फेऱ्या विलंबाने झाल्याने प्रवाश्यांना त्रासाचा सामन करावा लागला. (प्रतिनिधी)
प्रासंगिक करारावरील १६ गाड्याही रवाना
केंद्र शासनाच्या या अध्यादेशाला विरोध दर्शविण्याकरिता परिवहन विभागाच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. यामुळे प्रासंगिक करारावरील गाड्या जातील अथवा नाही असे वाटत असताना त्या गाड्या नियमित वेळत पोहोचल्या. गुरुवारी जिल्ह्यात एकूण १६ गाड्या आज करारावर होत्या.
ई-रिक्षाचा निषेध नोंदविण्याकरिता आॅटो युनियनच्यावतीने गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. यात शहरासह आसपासच्या परिसरातील आॅटोची चाके थांबली होती. यामुळे वर्धेत येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात पायी प्रवास करावा लागला. धरणे आंदोलन करण्यापूर्वी आॅटो युनियनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले. सदर बंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत असल्याची माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे यांनी दिली.
निवेदनात विम्याचे वाढते दर, महाराष्ट्रातील आॅटो चालकांकरिता कल्याणकारी महामंडळाची घोषणा, दहा वर्षांच्या आतील जुने परवाने नुतनिकरण करण्यात यावे, ज्येष्ठ आॅटो चालकांना पेंशन योजना लागू करण्यात यावी, आॅटो चालकांकरिता असलेली कलम ६६/१९२ कलम रद्द करावी, आॅटोवर नवीन मिटर न थोपता जुन्या मिटरवर आॅटो पासींग करण्यात यावे, आॅटो मिटरचे कैलीब्रेशन सर्टिफिकेटवर लाणारा दंड रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकडे आजचा बंद पुकारण्यात आला होता. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
४बसस्थानकासमोर असलेल्या आॅटो स्टॅण्डवर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्हा चालक-मालक आॅटो युनीयनचे जिल्हाध्यक्ष देवा निखाडे, जिल्हा महासचिव फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सुनील राऊत, शहर अध्यक्ष सुरेश कंजर यांच्यासह युनीयनचे तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील शाखेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.