भारतीय स्टेट बँकेत रकमेचा तुटवडा
By Admin | Updated: April 22, 2016 04:01 IST2016-04-22T04:01:37+5:302016-04-22T04:01:37+5:30
येथील भारतीय स्टेट बँक शाखेत रक्कमेचा तुटवडा असून मागणाऱ्या ग्राहकास गत १५ दिवसांपासून अर्धी रक्कम

भारतीय स्टेट बँकेत रकमेचा तुटवडा
हिंगणघाट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत रक्कमेचा तुटवडा असून मागणाऱ्या ग्राहकास गत १५ दिवसांपासून अर्धी रक्कम देण्यात येत आहे. त्यामुळे येथील उद्योजक, व्यावसायिक व मोठे गरजवंत नागरिक अडचणीत आले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हिंगणघाट हे व्यापाऱ्यांचे शहर आहे. येथील कृषी उत्पन्न बाजारातील धान्यासोबत कापसाची तसेच आॅईल मिल, दाल मिल, जिनिंग-प्रेसींग, आदी उद्योगासोबतच कापड किराणा, हार्डवेअर व्यवसायाची उलाढाल प्रचंड आहे. यातही सध्या लग्न समारंभानिमित्ताने मालाची खरेदी विक्री जोरात आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल जोरात असताना येथील भारतीय स्टेट बँकेत मात्र रक्कम उपलब्ध नसल्याचे कारणावरून ५० हजारावरील विड्राल त्याप्रमाणात होत नाही. मागेल त्याला अर्धी रक्कम देण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याने व्यापारी, उद्योजक व गरजवंत नागरिक अडचणीत आहे. रिझर्व बँकेकडून रक्कमेचा पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे व दररोज ५ कोटीची आर्थिक उलाढाल रिझर्व बँकेकडून येणाऱ्या पैशात करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्व सामान्य नागरिकांना ई बँकींग एटीएम वापराचे ज्ञान अवगत नाही. अनेकांना दुसऱ्याकडून पैसे जमा करणे वा रक्कम काढण्याचे अर्ज भरून घ्यावे लागते. त्यामुळे या बँकेत शेतकरी शेतमजूर वृद्ध नागरिक, व्यापारी, उद्योजकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते; परंतु या बँकेत ग्राहकांच्या व्यवहारासाठी केवळ दोन काऊंटर सुरू ठेवण्यात येत असल्याने ग्राहकांना तासंतास ताटकळत उभे रहावे लागते. तर अनेक जण रांगा पाहून परतही जाते. यामुळे बँक व्यवस्थापकाने या संदर्भात मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करावी
४सध्या स्थितीत बँकेत रकमेचा तुटवडा आहे. यामुळे येथे तासनतास ग्राहकांना उभे रहावे लागते. यामुळे बँक व्यवस्थापनाकडून बँकेत पैसे टाकणाऱ्यांसाठी स्वतंत्र काऊंटरची करण्याची आवश्यकता वर्तविली जात आहे.
मागणीच्या प्रमाणात रिझर्व बँकेकडून रक्कमेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्राहकांना पूर्ण रक्कम देण्यात अडचण येत आहे. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी एटीएम, ई बँकींग, मोबाईल बँकींगचा वापर करण्याची गरज आहे.
-गजानन माळवे, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, शाखा हिंगणघाट