शिवारफेरीने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात
By Admin | Updated: January 7, 2015 22:58 IST2015-01-07T22:58:28+5:302015-01-07T22:58:28+5:30
पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे,

शिवारफेरीने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात
वर्धा : पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले.
वर्धा तालुक्यातील पालोती गावापासून जलयुक्त शिवार अभियान २०१९ ची सुरुवात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार राहुल सारंग, सरपंच ज्योत्सना वैरागने, उपसरपंच रवींद्र राऊत, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सोना म्हणाले, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे मोल ओळखून प्रत्येकाने अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच योग्य त्या सूचना करून आदर्श गवासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार अभियानासाठीही सर्वांनी सुनियोजन करावे. त्याकरिता प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बऱ्हाटे यांनी जलयुक्त शिवार अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी. त्यातून रोजगार उपलब्ध होऊन गाव स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी सामोरे यावे, असे आवाहन केले. यावेळी भुयार, राऊत यांनी गावाच्या विकासाबाबत विचार मांडले.
प्रारंभी सोना यांचे पालोती ग्रामपंचायतीतर्फे सरपंच ज्योत्सना वैरागने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी करून आभारही मानले.